महाराष्ट्रात बुलेट ट्रेन आणि वेगवान रेल्वे प्रकल्पांची चर्चा असताना, एक असा प्रकल्प आहे जो तब्बल 102 वर्षांपासून कागदावरच अडकून पडला होता. पंढरपूर-फलटण रेल्वे मार्ग. ब्रिटीश काळात मंजूर झालेला हा प्रकल्प आता अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. तब्बल शतकभराच्या प्रतीक्षेनंतर केवळ 45 दिवसांत हा ऐतिहासिक प्रकल्प मार्गी लागणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
कागदावरून प्रत्यक्षात ,102 वर्षांचा प्रवास
1923 साली ब्रिटीश राजवटीत पंढरपूर आणि लोणंदला जोडणारा रेल्वे मार्ग आखण्यात आला होता. त्यासाठी पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील 18 गावांतील 807 एकर 10 गुंठे जमिनीचे भूसंपादनही करण्यात आले होते. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत हा प्रकल्प फाईलीतच अडकून पडला. आता मात्र हे चित्र बदलणार आहे.
नव्या ब्रॉडगेज लाईनला मंजुरी
या ऐतिहासिक मार्गावर आता ब्रॉडगेज लाईन मंजूर झाली आहे. विशेष म्हणजे, ब्रिटिश काळात जेवढी जमीन संपादित केली होती ती संपूर्ण जमीन रेल्वेने मागितली आहे. त्यामुळे 18 गावांतील जमीन कोणाच्या ताब्यात आहे, सध्याचे खातेदार कोण आहेत, याचा बारकाईने सर्व्हे सुरू आहे.
महसूल व रेल्वे विभागाचा संयुक्त सर्वेक्षण मोहीम
सध्या पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील इसबावी, वाखरी, भाळवणी, भंडीशेगाव, धोंडेवाडी, गुरसाळे, दहिगाव, धर्मपुरी, नातेपुते, पानीव, फॉडशिरस, मांडवे, विझोरी, वेळापूर या 18 गावांमध्ये महसूल विभाग व रेल्वेचे अधिकारी मिळून संयुक्त सर्वेक्षण करत आहेत.
45 दिवसांत रिपोर्ट सादर
हा सर्वेक्षण अहवाल सोलापूर रेल्वे विभागाला पुढील 45 दिवसांत सादर करण्यात येणार आहे. या रिपोर्टनंतर प्रत्यक्ष भूसंपादन, कामाची टप्प्याटप्प्याने सुरुवात आणि रेल्वे मार्गाच्या उभारणीला वेग येईल. शेतकऱ्यांपासून स्थानिक रहिवाशांपर्यंत अनेकांच्या डोळ्यातल्या आशेच्या ज्योतीला आता उजाळा मिळणार आहे.
102 वर्षांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने पहिलं पाऊल
स्वातंत्र्यपूर्व काळातच बार्शी लाईट रेल्वे कंपनीने हाती घेतलेला हा प्रकल्प अखेर प्रत्यक्ष आकार घेत आहे. तब्बल शतकभर रखडलेल्या या मार्गाची कहाणी म्हणजे काळाचा दस्तावेज आहे. पंढरपूरच्या भक्तीभूमीला आणि फलटणच्या औद्योगिक प्रगतीला जोडणारा हा मार्ग केवळ रेल्वे प्रकल्प नसून, तो महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनेही ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.