राजकारणात शरद पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही; राणेंचा फडणवीसांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही,’ असा सल्ला माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस यांनाच माहीत असेल. पण शरद पवार हे जेव्हा एखाद्या पक्षाला प्रस्ताव देतात, तेव्हा तोच प्रस्ताव दुसऱ्या पक्षाला दिला नसेल याची शाश्वती नाही असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडींबद्दल बोलत होते.

२०१९च्या निवडणुकीनंतर थेट शरद पवार यांच्याकडून भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव आला होता. पण ऐनवेळी पवारांनी वेगळी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी अलीकडंच केला होता. त्याबद्दल राणे यांनी आपलं मत मांडलं. ‘राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे. शरद पवार हे काहीही घडवू शकतात,’ असं राणे म्हणाले. भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे काँग्रेसला एकाकी पाडण्यासाठी केलं होतं, असं मी मानत नाही. पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यामुळं त्यांना अनेक गोष्टी माहीत आहेत. त्यातून राष्ट्रीय भावनेतून ते बोलले असावे,’ असंही राणे म्हणाले.

राज्यातून कोरोना तेव्हाचं जाईल जेव्हा सरकार बदलेल
राज्यातील करोनाच्या स्थितीवरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्ला चढवला. ‘कोरोनाचा रोखण्यात राज्य सरकार पुरतं अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. लोकांचे मृतदेह ठेवायला जागा नाही. रुग्ण वाढत आहेत. जनतेची सुरक्षा करण्यास हे सरकार असमर्थ आहे. लॉकडाऊन घोषित केलं जात पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. देशातील करोना रुग्णांचे आकडे महाराष्ट्रामुळं वाढलेले आहेत. जनता बेजार झाली आहे. हे सरकार बदलल्याशिवाय करोना जाणार नाही,’ अशी टीका राणेंनी केली.

असा मुख्यमंत्री अजून पाहिला नाही
‘राज्य चालवण्याचा कुठलाही अनुभव मुख्यमंत्र्यांना नाही. सरकारमध्ये आपसात मतभेद आहेत. त्यामुळं सरकारी यंत्रणांवर अंकुश नाही. घरात बसून आदेश काढले जातात. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी आजवर पाहिला नाही,’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला. महाराष्ट्र भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment