हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या परभणी दौऱ्यात किसान सभा अन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलन करत गोंधळ निर्माण झाला . ‘एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला’, या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत चून्याच्या डब्या त्यांच्या ताफ्यावर फेकल्या. पण पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि अजित पवारांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला.
अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी –
दुपारी 12 वाजता अजित पवारांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि किसान सभेचे कार्यकर्ते अचानक घोषणाबाजी करत पुढे धावले. आंदोलकांनी “शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेणार नाही”, “सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है”, अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि अजित पवारांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन फसवणूक –
आंदोलनकर्त्यांनी परभणी जिल्ह्यातील माळसान्ना गावातील दुहेरी आत्महत्येचा मुद्दाही उपस्थित केला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची अजित पवारांनी भेट घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. “शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन फसवणूक केली. स्वतःच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची माफी करून घेतली, हेच सरकारचे खरे लाभार्थी कोण आहेत हे दाखवतं,” अशी टीका युवक काँग्रेस व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी या आंदोलनप्रकरणी काही कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.