राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात; काँग्रेस चार्ज होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्यास काँग्रेस सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आजपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेचा उद्देश प्रेम आणि बंधुता पसरवणे हा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. म्हणूनच याला ‘भारत जोडो यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी निघणार आहे. या 3500 किमीच्या प्रवासात 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल. पाच महिन्यांच्या या पदयात्रेची सुरुवात खुद्द राहुल गांधी बुधवारी तामिळनाडूतून करणार आहेत. हा प्रवास दोन टप्प्यात असेल. यामध्ये राज्यातील 100-100 लोक सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रेत दररोज 25 किमीचा पायी प्रवास असेल आणि एकूण 3500 किमीचा प्रवास 150 दिवसांत पूर्ण केला जाईल. 21 पर्यंत हि यात्रा महाराष्ट्रात येऊ शकते. यावेळी राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनताही यात्रेत सहभागी होणार आहे. अनेक ठिकाणी चौपाल आणि सर्वसाधारण सभांचे आयोजनही केले जाणार आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेसाठी 117 नेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार, पवन खेरा आणि पंजाबचे माजी मंत्री विजय इंदर सिंगला यांचीही नावे आहेत. या यादीत युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशवचंद्र यादव आणि उत्तराखंड काँग्रेसचे संपर्क विभाग सचिव वैभव वालिया यांच्याशिवाय अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.