राज ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आप्पासाहेब धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल देण्यात आला. मात्र या सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा फटका बसल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर काही जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. यावरून शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा सरकारला चांगलंच सुनावलं आहे. आप्पासाहेबाना राजभवनात सुद्धा पुरस्कार देता आला असता, राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असं म्हणत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.

राज ठाकरे यांनी आज एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेट घेतली. यांनतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. सकाळी कार्यक्रम करण्याची गरज नव्हती. सर्वच ठिकाणी वातावरण उन्हाने तापलेलं आहे. त्यामुळे इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा स्वत: आप्पासाहेबांना राजभवनावर बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. या दिवसात एवढ्या लोकांना बोलावून पुरस्कार देण्याची गरज नव्हती. झाली ती गोष्ट दुर्देवी आहे. यासाठी कसं कुणाला जबाबदार धरणार कळत नाही. परंतु सकाळी न करता संध्याकाळी कार्यक्रम केला असता तर प्रसंग टाळता आला असता, असं राज ठाकरे म्हणाले.

या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला त्यावर उत्तर देताना हे हेतूपूर्वक कोणी केलेलं नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करावा असं मला वाटत नाही असं त्यांनी म्हंटल तसेच राजकीय स्वार्थासाठी हा कार्यक्रम घडवून आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटत असा सवाल केला असता राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं आहे.