एकनाथाच्या राज्यात शेतकरी मात्र अनाथ; राजू शेट्टींचे सरकारला खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवकाळी पाऊसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे अशी टीका करत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी विनंती राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे गेली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कांदा द्राक्ष, भोपळा, पेरु तसेच भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरं तर तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते. अशा अवस्थेत एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका असं राजू शेट्टी यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/Rajushetti27/videos/249530470808072/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR

ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला तुम्ही गेला आहात त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आज जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे. आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल तर अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी कळकळीची विनंती राजू शेट्टी यांनी केली आहे.