कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यानंतर राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते अशी टीका त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेलीय. एकीकडं सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडं आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे..

दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते असं म्हणत रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

बोम्मई नेमकं काय म्हणाले होते-

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावावर दावा करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला असल्याचे बोम्मई आणि म्हंटले होते. त्यांनी थेट महाराष्ट्रातील काही गावांवर आपला हक्क सांगितल्याने महाराष्ट्रातील जनतेकडून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.