अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम; राऊतांचा नितीशकुमार -भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish kumar)यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आज संध्याकाळी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा शपथविधी घेणार आहेत. नितीशकुमार यांनी अचानक बदललेल्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नितीशकुमार यांच्यासहित भाजपवर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचे मानसिक स्वस्थ बिघडलं आहे, अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम आहेत असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. (Sanjay Raut On Nitish Kumar)

अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, मला वाटते बिहारमध्ये जे काही चालले आहे ते देशाला सर्वात मोठा धोका आहे. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे. ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले तरी आम्हला काही फरक पडत नाही. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम आहेत. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे. एकीकडे रामाचे सत्य वचन आणि रामराज्य याबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे बिहारमध्ये तुम्हाला पलटूरामला सोबत घ्यायचे आहे. देशात राम आणायचा की पलटूरामची सत्ता आणायची? असा सवालही राऊतांनी केला.

दरम्यान, आरजेडीशी फारकत घेऊन नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा NDA मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांयकाळी ७ वाजता बिहार मध्ये पुन्हा एकदा भाजप- जेडीयू सरकार स्थापन होईल. नितीशकुमार ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर भाजपकडून २ उपमुख्यमंत्री देण्यात येतील. विशेष म्हणजे मागील ४ वर्षात तिसऱ्यांदा बिहारमध्ये सत्ताबदल होत आहे. आणि प्रत्येकवेळी नितीशकुमार हे केंद्रस्थानी राहिले आहेत. नितीशकुमार यांनी अचानकपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडी आणि बिहारच्या राजकीय परिस्थितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.