…तर आम्हाला बेळगावात महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या, संजय राऊतांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. बोम्मई जर सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत असतील तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा उलट सवाल संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि देशातील प्रत्येक राज्यांनी एकत्र येऊन देश निर्माण केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशी सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते. गुवाहाटीवरून येताना आसाममध्ये आसाम भवन उभ करण्याच ठरवलं. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन उभं करणार असल्याचे सांगितले.

मुंबईमध्ये सुद्धा अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत. पण जर तुम्ही सीमा वादाच्या लढ्यात काही गावांवरती हक्क सांगत सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्यावी. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येईल, त्या संदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिंदे गटातील आमदार मूग गिळून गप्प

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरून यावेळी राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा मी सन्मान समजतो. खर म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. छत्रपतींचा अपमान तुम्ही सहन करताय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करताय, तर त्यांनाही शिव्या याद्या, तुम्हाला जर इतक्या उत्तम शिव्या देता येत असतील, त्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमच्या शिव्यांच कौतुक करेल, असे राऊत यांनी म्हंटले.