Satara News : दुचाकीस्वार महिलेच्या कमरेत हात घातला; स्पर्श करण्यासाठी पाळत ठेवून पाठलाग केला अन नंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी (Satara News) । शुभम बोडके
सातारा शहरामध्ये गेल्या महिन्याभरात दोन अशा अनपेक्षित घटना घडल्या की शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या मनात आता असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागलीय. त्याचं कारण म्हणजे अनोळखी महिलांना स्पर्श करण्यासाठी त्याचे हात निर्लज्जपणे सरसावत आहेत. तो त्याचे विकृत चाळे करण्यासाठी निर्जन ठिकाण पाहून महिलांना लक्ष्य बनवतो आहे. हा धक्कादायक प्रकार दोन महिलांच्या बाबतीत नुकताच घडला आहे. त्या अनोळखी व्यक्तीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

सातारा शहर तसं पाहिलं तर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं. परंतु अलिकडे शहरामध्ये सातत्याने कुठे ना कुठे तरी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. यातील दोन घटनांनी मात्र शहरातील महिलांच्या मनात भीतीदायक वातावरण तयार केलंय.

मागील आठवड्यात एक नोकरदार महिला ऑफिसमधील आपले काम आटोपून रात्री आठ वाजता एकटीच दुचाकीवरून घरी निघाली होती. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधून जात असताना तिच्यावर अनोळखी विकृत व्यक्तीने पाळत ठेवून पाठलाग केला. दुचाकीस्वाराने ग्रेडसेपरेटरमधील शांतता, कमी वर्दळ पाहून दुचाकी वरूनच महिलेच्या कमरेत हात घालून स्पर्श केला. satara news

अनपेक्षितरित्या घडलेल्या या घटनेने ती महिला भयभीत झाली. या प्रकारानंतर संबंधित दुचाकीस्वार तेथून पसार झाला. काही क्षणाचा विलंब न लागत ही घटना घडली. संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत त्या विकृत व्यक्तीच्या दुचाकीचा नंबर पाहिला. तेथून बाहेर आल्यानंतर त्या महिलेने फोनवरून आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर महिलेने कुटुंबियांसह शहर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातील बोगद्यामध्ये घडला होता. या प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याने महिलांच्या मनात आता भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी वेळेत पावले उचलून त्या अज्ञात विकृत व्यक्तीवर कारवाई केली, तर महिलांच्या मनात घर करून बसलेली भीती निघून जाईल. शिवाय अशा प्रकारचे कृत्य पुन्हा कोणी करण्याचे धाडस करायचे नाही. पोलिसी खाक्या दाखवून त्या विकृत व्यक्तीला अद्दल घडविण्याची गरज आहे. त्यासाठी पोलीस यंत्रनाही कामाला लागलीय

शहरामध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून ४० ते ४५ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, हे सीसीटीव्ही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे रेकार्ड झालेले आरोपींचे चेहरे आणि त्यांच्या गाडीचा नंबर स्पष्टपणे दिसून येत नाही. यामुळे पोलिसांना तपासामध्ये अडथळे येत असताना दिसत आहेत. satara News

सातारा शहरात गेल्या सहा ते सात महिन्यांत २० विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यात महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला यांचा सर्वाधिक समावेश आहे. विनयभंग करणारे हे नोकरदार महिलेचे सहकारी तर महाविद्यालयीन तरुणींचे मित्र, नातेवाईक, शेजारी असल्याचे गुन्हे दाखल झाल्याच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे. अपवाद वगळता रस्त्यामध्ये विनयभंगाच्या घटना कमी प्रमाणात घडत आहेत. सर्वाधिक घटना या कार्यालय व घरांमध्ये घडत आहेत.