सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारमध्ये पाठीमागील सीट वर बसलेल्या लोकांनाही सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच याच पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, सायरस यांच्या अपघातामुळे सरकारने मागे बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसेल तर अलर्ट वाजला जाईल. ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर त्यासाठी दंडाची तरतूद आहे. मात्र मागे बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंडही भरावा लागणार आहे. हे सर्व कारसाठी लागू होईल. यासंदर्भात तीन दिवसांत अधिसूचना जारी केली जाईल, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर येथे कार अपघातात मृत्यू झाला. प्राथमिक तपासाच्या आधारे, दोन्ही प्रवाशांनी सीट बेल्ट न लावणे हे या जीवघेण्या अपघाताचे प्रमुख कारण आहे असं पोलिसांनी म्हंटल. सीट बेल्ट न लावल्याने जेव्हा त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर आदळली तेव्हा पाठीमागे बसलेले दोन्ही प्रवासी उडून पुढच्या भागाकडे धडकले.