हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील पशुपालकांना मदतीचा हात देण्यासाठी “शरद पवार ग्राम समृद्धी” योजना (Sharad Pawar Village prosperity) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गाय-म्हैस पालनासाठी आधुनिक व पक्क्या गोठ्यांसाठी विशेष आर्थिक मदत दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी उत्तम सुविधा मिळणार आहे. तसेच, दूध उत्पादन वाढविण्यास आणि पशुपालन अधिक सोपे करण्यास मदत होणार आहे.
गोठा अनुदान योजनेचे स्वरूप
३ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर झालेल्या या योजनेत शेतकरी आणि पशुपालकांसाठी गोठा बांधकामासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते. आधुनिक पद्धतीने बांधलेला गोठा केवळ जनावरांच्या आरोग्यासाठीच उपयुक्त ठरत नाही, तर तो दूध उत्पादनात वाढ करण्यासही हातभार लावतो, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. या योजनेत गाय-म्हैस पालनाबरोबरच शेळीपालन, कुक्कुटपालन आणि अन्य पशुपालन व्यवसायांसाठीही अनुदान उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
- आधुनिक गोठ्यांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल आणि दूध उत्पादन वाढेल.
- पशुधनाची निगा राखणे आणि व्यवस्थापन करणे सोपे होईल.
- मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज नाही, कारण सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाते.
- शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल आणि पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम होईल.
गोठा बांधकामासाठी अनुदान किती?
२ ते ६ जनावरांसाठी: ७७,१८८
६ ते १२ जनावरांसाठी: १,५४,३७६
१३ किंवा अधिक जनावरांसाठी: २,३१,५६४
योजनेचा प्रत्यक्ष लाभ आणि प्रगती
या योजनेअंतर्गत आतापर्यंत १००७ गोठे पूर्ण झाले आहेत. तर सध्या ४५३ गोठ्यांचे काम सुरू आहे. पशुपालकांना या योजनेचा मोठा लाभ होत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामूळे इच्छुक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागात अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पशुधन असल्याचा पुरावा
- जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे
कोण अर्ज करू शकतो?
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
- स्वतःच्या नावावर जागा असणे आवश्यक आहे.
- पशुपालनाचा अनुभव असावा.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक मोठी संधी ठरत आहे. पारंपरिक शेतीसोबत पशुपालनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पशुधन व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिक लाभ घ्यावा.