पहाटेचा शपथविधी झाला नसता तर…; पवारांच्या विधानाने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी वरून अजून राजकीय चर्चा जोर धरत आहे. पवार साहेबांशी चर्चा करूनच हा शपथविधी झाल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीच याबाबत पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य केलं आहे. पहाटेच्या शपथविधी मुळे महाराष्ट्रातील राष्टपती राजवट उठली असं मोठं विधान त्यांनी केलं.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीमुळे एक गोष्ट चांगली झाली. राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट या शपथविधीमुळे उठली. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असाही सवाल शरद पवारांनी केला. पवारांच्या या विधानाने पुन्हा एकदा तर्क वितर्काना उधाण आलं आहे. या शपथविधी मागे खुद्द शरद पवारच होते का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते-

अजित पवारांसोबतचा शपथविधी हा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच घेतला होता असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यांच्या संमतीनेच हा शपथविधी झाला होता अशा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला होता . अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. मात्र त्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या आणि अजित पवार कसे तोंडघशी पडले हे तेच सांगतील. जर त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन”, असेही फडणवीसांनी सांगितलं.