रक्त आणि अश्रूने महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सध्या अपघाताचा मार्ग ठरत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला आणि यामध्ये 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आजच्या सामना अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? असा थेट सवाल सामनातून करण्यात आलाय.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे ?

नावात ‘समृद्धी’ असलेल्या महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांची मालिका थांबायला तयार नाही. ज्या समृद्धीच्या वल्गना या महामार्गाच्या निर्मात्यांनी केल्या ती समृद्धी कधी येणार, हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु या महामार्गावरील अपघात, दुर्घटना आणि निरपराध्यांच्या बळींमध्ये मात्र दिवसेंदिवस ‘वृद्धी’च होत आहे. गेल्याच महिन्यात या महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसच्या भीषण अपघातात सुमारे 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. आता शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भयंकर दुर्घटना घडली. त्यात 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला. आता या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे. नुकसान भरपाई जाहीर केली आहे. राज्यकर्त्यांनी दुःख वगैरे व्यक्त केले, पण अशी वेळ समृद्धी महामार्गाबाबत वारंवार का येत आहे, याचा विचार तुम्ही कधी करणार आहात?

या महामार्गाचा अपघातांचा महामार्ग असा बदलौकीक होत आहे. नावात समृद्धी असलेल्या महामार्गाबाबत ही परिस्थिती ना सरकारसाठी भूषणावह आहे ना जनतेसाठी सुखावह, परंतु तरीही महामार्गाचे उर्वरित 200 किलोमीटर कामाचे घोडे पुढे दामटले जात आहे. ज्या सरलांबे येथील पुलावर सोमवारची दुर्घटना घडली त्या पुलाच्या कामाबाबतही सरकारची हीच घिसाडघाई सुरू असल्याचा आरोप आहे. पुलाचे उरलेले 20 टक्के काम पुढील महिनाअखेर पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ कंत्राटदार कंपन्यांना दिले गेले आहे. त्यामुळे रात्रंदिवस, पावसाळी वातावरणातही या पुलाचे काम सुरूच आहे. याच दबावाने आणि घिसाडघाईने 20 निरपराध कामगारांचा हकनाक बळी घेतला. त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर पाडले. गेल्या महिन्यात लक्झरी बसला झालेल्या अपघातावरून सरकारने संबंधित बस चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मग आता सोमवारच्या दुर्घटनेबाबत काय करणार आहात? कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बळीचा बकरा बनवणार आणि स्वतः पुन्हा मोकळे होणार असं म्हणत सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.

? समृद्धी महामार्गावरील आजवरच्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांच्या किंकाळय़ा, त्यांच्या नातलगांचा आक्रोश यामुळे ना सरकारच्या कानाचे पडदे फाटत आहेत ना हृदयाला पाझर फुटत आहे. ‘समृद्धी’ महामार्ग हा म्हणे सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? पुन्हा समृद्धी येणार वगैरे ‘दिवास्वप्न’च आहेत. राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यूने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे. सोमवारच्या पूल दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले. राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? असा थेट सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.