‘कोरोना जोमात व सरकार कोमात’ ; सामनातून मोदींवर थेट हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवित सुटले आहेत आणि त्यापुढे निप्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. ‘कोरोना जोमात व सरकार कोमात’ अशी ही अवस्था आहे. कोविडच्या नवीन संकटापासून वाचवण्यासाठी जनतेला कोणी वाली आहे काय? असा सवाल करत सामनातून मोदींवर हल्लाबोल कऱण्यात आलाय.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे?

महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढत असतानाच कोरोनाच्या संकटानेही पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तापमानाचा पारा खाली उतरल्यामुळे देशभरातच कोविडच्या विषाणूंसारखे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यात कोविड – 19 या विषाणूच्या जेएन-1 या नवीन व्हेरियंटने आपल्या देशातही वेगाने हातपाय पद्भरायला सुरुवात केली आहे. देशात दर तासाला सरासरी 29 जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीची ही गती धोकादायक आहे. मात्र राज्य सरकारांसह केंद्रीय सरकार व सत्तारूढ पक्षाला निवडणूक ज्वराने झपाटले आहे. सरकारपक्षच पूर्णवेळ ‘जोड- तोड तांबा-पितळ’च्या नसत्या उद्योगात रमल्यामुळे प्रशासनाच्या पातळीवरही सगळाच आनंदी आनंद आहे. सत्तारूढ पक्षाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तमाम नेते ज्या पद्धतीने 24 तास इलेक्शन मोडवर आहेत ते पाहता प्रचंड वेगाने पसरत चाललेल्या कोविडच्या नव्या संकटाकडे लक्ष देण्यास या नेतेमंडळींकडे फुरसत आहे तरी कुठे?

नाही म्हणायला आठवडाभरापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतर्कतेचा इशारा दिला. तथापि, ही औपचारिकता वगळता वेगाने फैलावणारे संक्रमण रोखण्यासाठी कुठलीही ठोस पावले सरकारने उचललेली दिसत नाहीत. जेएन-1 या नव्या कोविड विषाणूने देशाच्या अनेक राज्यांत थैमान घातले आहे. या विषाणूचे गुरुवारी एकाच दिवसात 797 नवीन रुग्ण देशभरात आढळले व गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी 2 जण केरळमध्ये, तर महाराष्ट्र, तामीळनाडू, प. बंगाल व पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एक जण दगावला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटून दोन आकडी संख्येवर आली असताना गेल्या 20 दिवसांत सक्रिय झालेल्या कोविडच्या नवीन विषाणूमुळे कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू झाला. एक आठवड्यापूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येने अचानक उसळी घेतली. 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी 594 नवीन रुग्णांची नोंद झाली व सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 311 वर जाऊन पोहोचली.

2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या भयंकर संकटाने तब्बल दोन वर्षे देशभर उच्छाद मांडला होता. 5 लाख 30 हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे देशभरात मृत्युमुखी पडले. प्रारंभिक काळात केलेले दुर्लक्ष व जनतेच्या सुरक्षेपेक्षाही राजकारण व निवडणूक सभांना दिलेले महत्त्व यामुळेच कोरोनाचे संक्रमण झपाटयाने वाढले. आताही तेच घडते आहे. ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे शुक्लकाष्ठ पुन्हा एकदा मागे लागले आहे आणि मायबाप सरकार मात्र निवडणूक व्यवस्थापनात मश्गुल आहे. कोरोनाच्या वाढत्या गतीपेक्षाही सरकारला सत्तेची फिकीर आहे. गावोगाव पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचारयात्रा सुरू आहे. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवीत सुटकले आहेत आणि त्यापुढे निप्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. ‘कोरोना जोमात व सरकार कोमात’ अशी ही अवस्था आहे. कोविडच्या नवीन संकटापासून वाचवण्यासाठी जनतेला कोणी वाली आहे काय? आसा थेट सवाल सामनातून करण्यात आलाय.