‘इरफान’ नावाचं वादळ कायमचं शांत झालंय..आज त्याने मृत्यूलाही रडवलंय !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बॉलिवूड कट्टा | विभावरी विजया नकाते

ओम पुरी यांच्या निधनानंतर इरफान त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आला असताना एका पत्रकाराने इरफानला प्रश्न विचारला, कसं वाटतंय या प्रसंगी? त्यावेळी इरफानने दिलेलं उत्तर होतं – आज त्यांचा मृत्यू झालाय, काही दिवसांनी माझा होईल. यापेक्षा वेगळं काहीच नाही. आपलं वास्तव जगणं असो किंवा पडद्यावरील वावरणं.. ते कधीच स्क्रिप्टेड वाटणार नाही अशा अंदाजात जगण्याचा सच्चेपणा लोकांसमोर मांडणाऱ्या इरफानने आज आपल्यातून अचानक एक्झिट घेतली. आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे वेगळे असे भक्कम स्थान निर्माण केलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर अविरतपणे अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरलेला असा एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे इरफान खान…!! आज दुपारीच त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरलीय. परंतु फक्त बॉलिवूडचे कलाकारच न्हवे तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या कित्येक चाहत्यांना सुद्धा आपल्या आवडत्या अभिनेत्याला कायमचं गमावल्याची भावना अतिशय त्रासदायक ठरत आहे.

Neuroendocrine Tumour या दुर्धर आजाराशी इरफान खानच्या सुरू असणाऱ्या लढाईस आज पूर्णविराम मिळाला. 2018 मध्ये त्याला या आजाराचे निदान झाले होते. त्या नंतर परदेशातुन उपचार करून इरफान भारतात परतला होता. तेव्हापासून तो सिनेसृष्टीपासून लांबच होता. मंगळवारी रात्री कोकीळाबेन रुग्णालयात दाखल झालेल्या इरफानाने आज उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने त्याच्या जगभरातील चाहत्यांना दुःखाचा जबर धक्का दिलाय एवढं मात्र खरं..

एका निवांत क्षणी – इरफान

करिअर – इरफान खान हा भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्वाचा कलाकार म्हणून ओळखला जातो तो प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अभिनयामुळे. त्याच सोबत ब्रिटिश फिल्म्स आणि हॉलिवूडमधील त्याचं कामसुद्धा तितकंच उल्लेखनीय आहे. चित्रपट समीक्षक, समकालीन अभिनेते, या क्षेत्रातील सर्वच तज्ञ व प्रेक्षक या सर्वांच्या मनामध्ये इरफान खानने गेल्या काही दशकात भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अशी ओळख निर्माण केली. गेल्या तीस वर्षांच्या काळामध्ये 50 पेक्षा अधिक चित्रपटांमधून त्याने आपल्या अतिशय वैविध्यपूर्ण आणि नैसर्गिक अभिनयाने या सृष्टीवर राज्य केले. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी जयपूरहून दिल्लीला नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये जाताना आईशी खोटं बोलल्याची आठवण इरफान नेहमी त्याच्या मुलाखतीत सांगायचा. चित्रपट क्षेत्र हे इरफानच्या घरातील लोकांना नेहमीच कमी दर्जाचं वाटायचं. नाच-गाणी करणारे लोक चांगले कसे असंच त्यांचं म्हणणं होतं. आपण दिल्लीला फक्त अभिनय शिकायला जात असून, पुन्हा जयपूरला माघारी येऊन इथल्या मुलांना अभिनय शिकवणार असल्याची थाप मारून इरफान घराबाहेर पडला होता. नॅशनल स्कुल ऑफ ड्राममध्येसुद्धा ‘मी पूर्णवेळ नाटक क्षेत्रातच काम करणार असल्याची आणि चित्रपटांत जाणार नसल्याची’ थाप इरफानने लगावली. शिक्षण झाल्यानंतरही काही काळ काम न मिळाल्याने इरफान बोअर झाला होता. त्यानंतर त्याने नशीब आजमावण्यासाठी मुंबईला जायचा निर्णय घेतला.

हे हसणं दीर्घकाळ सोबत राहणारं आहे..!!

सिरियल्स आणि बॉलिवूड इंडस्ट्री – राजस्थानमधून मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने चाणक्य, भारत:एक खोज ,सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात , चंद्रकांता अश्या अनेक टी. व्ही. सिरियल्समध्ये भूमिका पार पाडत आपल्या कामाला सुरुवात केली. दूरदर्शन आणि स्टार प्लस या चॅनेलवरून प्रक्षेपित होणाऱ्या कित्येक सिरीयल्स आणि नाटक या क्षेत्रामध्ये काम करत काही वर्षे गेल्यानंतर त्याला Sallam Bombay हा त्याचा पहिला चित्रपट मिळाला. जो 1988 मध्ये प्रदर्शित झाला. या नंतर पुन्हा काही वर्षे तो चित्रपटांमध्ये सातत्याने काम करत राहिला, पण या काळात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तो अपयशी ठरत होता. अभिनय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकालाच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अश्या स्ट्रगलला सामोरे जावे लागते. इरफान खानच्या आयुष्यातला हाच त्याचा स्ट्रगलचा काळ होता. 2001 मध्ये The Warrior या ऐकतिहासिक चित्रपटात त्याने भूमिका पार पाडली. ही फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाली व तिथून त्याच्या चेहऱ्याला ओळख प्राप्त व्हायला सुरुवात झाली. त्याच्या अथक प्रयत्नांना हळूहळू यश मिळत गेलं. त्या नंतर त्याने Road Of Ladakh नावाची शॉर्टफिल्मसुद्धा केली. 2003-04 मध्ये Haasil आणि Maqbool या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेला Filmfare Award For Best Villain या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. 2005 मध्ये Rog नावाच्या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका पार पाडली. दरम्यान त्याने काही तेलगू चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. 2006 साली आलेल्या Nameseck चित्रपटानेही त्याच्या कारकिर्दीला वेगळं वळण दिलं. या नंतर 2007 मध्ये प्रदर्शित झालेला Life in a Metro हा चित्रपट इरफानच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या फिल्ममध्ये अनेक अभिनेते असले तरी कोंकणा सेन या अभिनेत्रीसोबत त्याची केमिस्ट्री चांगलीच गाजली. यातील भूमिकेतुन तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.

शिवाय वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी Filmfare Award For Best Supporting Actor ही त्याला मिळाला. या यशानंतर त्याने A Mighty Heart आणि The Darjeeling Limited नावाच्या दोन आंतरराष्ट्रीय फिल्म्स मध्ये काम केलं.2008 मध्ये Slumdog Millinaire हा चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट, चित्रपटाचा विषय व यातील कलाकार हे जगभरामध्ये कौतुकास पात्र ठरले. या चित्रपटाने Screen Actors Guild Award For Outstanding Performance by a Cast in a Motion Picture हा किताब पटकावला. 2011 मध्ये त्याच्या करिअरमधली अजून एक सर्वात महत्वाची फिल्म म्हणजेच Paan Singh Tomar प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका खेळाडूच्या आयुष्यावर आधारित असणारी ही बायोग्राफी प्रकारतील फिल्म त्याच्या अभिनयामुळे अतिशय चर्चेत राहिली. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला National Film Award For Best Actor ने सन्मानित केलं गेलं. 2013 मध्ये The Lunchbox या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या कौतुकास पात्र ठरला. दरम्यानच्या काळात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या Haider, Gunday, Piku, Talvar, No Bed Of Roses अश्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका पार पाडल्या. 2015 मध्ये इरफान ऐश्वर्या राय सोबत Jazbaa चित्रपटात झळकला. त्याच्या याही भूमिकेचे चित्रपट समीक्षकांकडून कौतुक झाले. याच पाठोपाठ 2017 मध्ये त्याच्या Hindi Medium या चित्रपटाने लोकप्रियतेची वेगळी उंची गाठली. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर $3.643 बिलियन इतकी कमाई करून जगाचे लक्ष वेधून घेतले. याच वर्षी त्याने Qarib Qarib Single या चित्रपटात सुद्धा भूमिका पार पाडली. मोठ्या पडद्यावरील या यशानंतर सुद्धा तो छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. Star Plus वाहिनीवरील “मानो या ना मानो” आणि “क्या कहें ” असे शो होस्ट करत त्याने आपले टेलिव्हिजन करिअर सुद्धा सुरू ठेवले.

पान सिंग तोमर हा इरफानच्या आयुष्यातील माईलस्टोन चित्रपट होता.

स्ट्रगलर जिंदगी – मुंबईत आल्यानंतरसुद्धा मनासारखं काम मिळेल अशी परिस्थिती इरफानच्या बाबतीत नव्हती. मरीन लाईनजवळ राहायला असलेला इरफान मुंबईतील गरीब लोकांच्या अवस्थेबद्दल पत्नीशी तासंतास बोलत राहायचा, त्यांच्या व्यथा कधीतरी पडद्यावर आणल्या पाहिजेत याबाबत सांगायचा. चित्रपटांत काम मिळत नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात टीव्ही सिरीयलमध्ये काम करायला इरफानने सुरुवात केली होती. अभिनय हा आपला आत्मा आहे, आणि तो मरु द्यायचा नाही हे मनोमन ठरवल्याचं इरफानने कबूलही केलं होतं. सुरुवातीच्या काळात काही भूमिका पैसे मिळवण्यासाठीच केल्याचंही इरफान सांगतो. ‘सलाम बॉम्बे ते द वॉरियर’ हा १३ वर्षांचा कालावधी इरफानला आणि त्याच्या परिवाराला लोकांची नियत, पैशासाठी बदललेली माणसं आणि इंडस्ट्रीचं खरं रुप दाखवून गेला. एखाद्या चित्रपटाला चांगला निर्माता भेटल्यानंतर दिग्दर्शकांनी इरफानला चित्रपट सोडायला सांगितल्याचंही इरफानच्या पत्नी शुपिता सिकदार यांनी एका मुलाखतीत सांगितलं. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये काम करत असताना इतर सामान्य मुलांप्रमाणे मौज-मजा करावी असं इरफानला कधीच वाटलं नाही, तो नेहमी पुस्तकांत, नाटकाच्या स्क्रिप्टमधेच गुंतून राहायचा असंही शुपिता यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. इरफानचा चेहरा नेहमी उदास, शांत असल्याचं कारण त्याला विचारलं असता – “मी खूप विचारी आहे” असं इरफानने कबूल केलं होतं. माझा चेहरा पाहून मी कधी अभिनेता होईल असं कुणाला वाटलं नसतं, पण माझ्या कामातील प्रामाणिकपणा आणि ते करण्याची माझी तळमळ यामुळं मी १०० कोटी क्लबवाल्या अभिनेत्यांपेक्षाही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचलो हे इरफानचं बोलणं २९ एप्रिल २०२० च्या दिवशी १००% खरं ठरल्याचं दिसून आलं.

नेमसेक चित्रपटातील एक क्षण

इंग्लिशची अडचण असूनसुद्धा हॉलिवूड गाजवलं – इंग्रजी बोलायला अडचण आहे, याची लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही आतून कसे आहात हे जास्त महत्वाचं असल्याचं इरफान सांगतो. बॉलिवूड सोबतच त्याने हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या भूमिकांमधून स्वतःचं स्थान निर्माण केलं. हॉलिवूडमध्ये काम करताना नवीन भाषा शिकण्यासाठी ट्रेनर घ्यायचा प्रश्न यायचा, त्यावेळी इरफान स्वतःहूनच त्याच्या तयारीसाठी वेगळी मेहनत करायचा. नंतर हळूहळू प्रगती करत हॉलीवूडलासुद्धा त्याने आपल्या प्रेमात पाडलं. The Amazing Spider- Man (2012) , Life Of Pi (2012), Jurassic World (2015), Inferno (2016) अश्या चित्रपटांमध्ये त्याने सहकारी कलाकार म्हणून विविध भूमिका पार पाडल्या. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स इरफानसोबत काम करण्याआधी म्हणाला होता, की आपल्या शूटिंग टीममधला सगळ्यात कूल (बिंदास) माणूस मी आहे. पण जसजसे दिवस पुढे गेले तसं टॉम हँक्स स्वतःच म्हणाले की इरफान हा तर माझ्यापेक्षा बिंदास माणूस आहे. 2018 मध्ये इरफान खान Karwan नावाच्या फिल्म मधून दलक्वीर सलमान, मिथिला पालकर या तरुण कलाकारांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच वर्षी Blackmail नावाच्या चित्रपटात सुद्धा त्याने काम केले. अलीकडेच म्हणजे 2020 मध्ये “अंग्रेजी मिडीयम” या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका पार पाडलीय. हाच त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

द वॉरियर चित्रपटातील इरफानची छबी

यामुळेच इरफान ग्रेट होता..!! – इरफानचे चित्रपट हे लोकांना रियल जगण्याचा फील देत होते. मदारीमध्ये न्याय हा सर्व लोकांसाठी समान असायला हवा हे दाखवताना इरफानने स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साकारलेली बापाची भूमिका कमाल होती. प्रत्येक सामान्य बापाला आपल्या लेकरांसाठी काहीतरी करण्याची जिद्दच इरफानच्या या भूमिकेने दिली. लाईफ ऑफ पाय या चित्रपटाचा विचार करता, दिग्दर्शक आंग ली यांच्या मते, इरफान जे मनोगत शेवटी व्यक्त करणार होता, त्यावर चित्रपटाचं यश आणि किंमत ठरणार होती. ते जर व्यवस्थित झालं नसतं तर पूर्ण चित्रपटच फ्लॉप होता याची जाणीव इरफानला वारंवार करुन देण्यात आली होती. इरफाननेही या छोटेखानी भूमिकेत जीव ओतला आणि ही भूमिका अजरामर केली. लंचबॉक्स या हलक्याफुलक्या चित्रपटात त्याने स्त्रीपात्राशी साधलेला मूक संवाद सस्पेन्स सोबत स्वतःमधील रोमँटिक आणि विचारी माणसाचा फील प्रत्येक सामान्य माणसाला करुन देत होता. ‘पान सिंग तोमर’ या भारताचा दुर्लक्षित राहिलेला नायक होता. त्यावर आधारीत चित्रपटाने पान सिंग तोमर आणि इरफानलाही भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करायला जागा दिली. या घटनेचं सर्वाधिक समाधान आयुष्यात असल्याचं इरफान सांगायचा. ब्लॅकमेल चित्रपटातील त्याची वेंधळा पण प्रेमळ नवरा, ज्याला बायकोच्या प्रेमासाठी, तिचं बाहेर अफेअर असतानासुद्धा तिच्यासाठी वाट्टेल ते करायची इच्छा होते – हे साकारताना इरफानने कमालीची संवेदनशीलता दाखवली आहे. रिटेक लागू शकणारे अनेक शॉट्स त्याने सिंगल टेकमधेच पूर्ण केले आहेत. हासिल या त्याच्या मित्रानेच (तिगमांशू धुलिया) दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी इरफानचं विशेष कौतुकही झालं होतं. त्यानंतर पुढील कित्येक चित्रपटांसाठी त्याला खलनायकाचीच ऑफर आली होती. इरफानचे अगदी शेवटी आलेले दोन चित्रपट – हिंदी आणि अन्ग्रेजी मीडियम – भारतीय पालकत्वाच्या सुजाणतेवर जळजळीत कटाक्ष टाकणारे होते. कुठलाही संदेश देण्याचा अविर्भाव न बाळगता दैनंदिन साध्या-सोप्या जगण्यातूनच इरफानने मुलांना आणि पालकांना द्यायचा तो संदेश व्यवस्थित देण्याचं काम या चित्रपटांतून केलं. त्याची प्रत्येक भूमिका लोकांना आत्मिक समाधान मिळवून देत राहिली, कनेक्ट करत राहिली. तुमच्या जीवनातील रोमँटिकपणा तुमच्या आयुष्यातील वाईट घटना आणि दुःखाला काउंटर करत असतो हे सांगत असताना आयुष्यातील रोमँटिकपणा जपा हे सांगायलाही इरफान विसरला नाही.

हरहुन्नरी कलाकार, अभिनयाचा शिक्षक, संवेदनशील व्यक्ती, सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्नशील असणारा अभिनेता, आयुष्यभर अनेक चढउतार पाहत त्यात खंबीरपणे उभा राहणारा, लहानपासून अतिशय स्ट्रगलला सामोरे जात अथक प्रयत्नांनी यशाची आणि लोकप्रियतेची सर्वोच्च शिखरे सर करून आयुष्याच्या अंतिम काळात पुन्हा धीरोदात्तपणे दुर्धर आजाराशी लढा देत आपल्यातून अचानकपणे निघून गेलेला परंतु आपल्या अजरामर भूमिकांमधून प्रेक्षकांच्यासाठी अमर झालेला असा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता इरफान खान..!!

आज इरफान खान आपल्यातून निघून गेला असला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये तो सदैव जीवंत असेल. असं म्हटलं जातं की “ज्या क्षणी तुम्ही एखाद्या कलाकाराच्या अत्यंत प्रेमात पडता त्याच क्षणी तो कलाकार अमर झालेला असतो..!!” आणि याच वाक्यानुसार त्याच्या अस्सल अभिनयामुळे त्याच्या प्रेमात असणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या मनात तो सदैव त्यांचा आवडता अभिनेता म्हणून सोबत असेल हे नक्की.

मदारीमधील इरफान खानची एक छटा

सदर लेख विभावरी विजया नकाते यांनी लिहिला असून त्या मानसशास्त्र विषयाच्या पदवीधर आहेत. वाचन, प्रवास आणि लिखाणाची त्यांना विशेष आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 8408877063

Leave a Comment