हातात तिरंगा घेऊन पृथ्वीराज चव्हाणांची गावागावांतून पदयात्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरुवात शहरातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून झाली. यानंतर हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. पदयात्रा चचेगाव, विंग, कोळे, कोळेवाडी, पोतले किरपे मार्गे तांबवे येथे पूर्ण करण्यात आली. या यात्रेचा कराड दक्षिण मधील दुसरा टप्पा 14 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस उदयसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, हिंदुराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, इंद्रजीत चव्हाण, नितीन थोरात, नानासो पाटील, नाना जाधव, राजेंद्र चव्हाण, जि प सदस्य शंकरराव खबाले, मंगल गलांडे, पं स सदस्य नामदेवराव पाटील, चचेगावचे अभिजीत पाटील आदिसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, यावर्षी स्वातंत्र्य लढ्याचा अमृत महोत्सव आपण तिरंगा यात्रेने साजरा करीत आहोत. 9 ऑगस्ट या दिवसाला आपल्या देशात अनन्य साधारण महत्व आहे. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गोवालिया टॅंक येथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना “चले जाव” ची निर्णायक हाक दिली. यामुळे या दिवसाला क्रांतीदिन म्हणून ओळखले जाते. या दिवसापासून पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा निर्णायक लढा चालूच राहिला. या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीला समजणें गरजेचे आहे, म्हणून काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 किलोमीटरची तिरंगा हातात घेऊन पदयात्रा काढली जात आहे.

यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान सांगण्याची संधी मिळत आहे. आपल्या पूर्वज्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून मुक्तता मिळाली. हि पदयात्रा फक्त 15 ऑगस्ट पर्यंतच आहे असं न समजता या यात्रेच्या निमित्ताने जो विचार आपण घराघरात पोहचवीत आहोत. तो स्वातंत्र्य संग्रामाचा विचार आपण कायम जपला तरच ती खरी श्रद्धांजली स्वातंत्र्य सेनानीना राहील. आज स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्य उपभोगताना युवा पिढीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळविताना क्रांतिकारकांनी काय वेदना सहन केल्या आहेत, जो त्याग केला आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे.