ST कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्र्यांची दिलासादायक घोषणा ! खात्यात आजच 120 कोटी रुपये जमा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आपल्या पगार आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाच्या मार्गावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अखेर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आजच 120 कोटी रुपये जमा होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

मार्च महिन्यात राज्यभरातील एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत आंदोलने केली होती. त्यानंतर सरकारने तातडीने लक्ष घालत त्यांच्या मागण्यांवर चर्चा सुरू केली. एकूण 176 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यातील 120 कोटी रुपये लगेच वितरित होणार आहेत. उर्वरित रक्कम तीन टप्प्यांत दिली जाईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

पगारासाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आश्वासक शब्द

“पगाराची वेळेवर अंमलबजावणी ही कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, भीक नव्हे,” असं स्पष्ट करत प्रताप सरनाईक यांनी पुढील महिन्यापासून प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार सात तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, “मीसुद्धा गरिबीतून वर आलोय. एकनाथ शिंदे आणि मी दोघंही कधी काळी रिक्षा चालवत होतो. त्यामुळे अशा प्रश्नांची तीव्रता आम्हाला समजते.”

महायुतीमध्ये पगारावरून श्रेयवादाचा धुराळा ?

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावरुन आता महायुतीतील दोन मोठ्या नेत्यांमध्ये श्रेयवाद उफाळून आला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतः वित्त सचिवांना फोन करून वेतन वितरणासंदर्भात हस्तक्षेप केल्याचा दावा केला आहे. तर अजित पवार यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सोडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक आणि परिवहन खात्यातील समन्वयावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या?

  • शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के महागाई भत्ता देणे
  • एप्रिल 2016 ते 2021 या काळातील घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी
  • जाचक आवेदन प्रक्रिया आणि आरटीओ विभागाकडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई रद्द करणे

या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनांनी सरकारकडे वारंवार निवेदनं दिली आहेत. आता सरकारने सकारात्मक पाऊल टाकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण आहे. मात्र, या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत होणं हेच आता महत्त्वाचं ठरणार आहे.