पुसेसावळीच्या ग्रामपंचायतीवर ‘लक्ष्मीनगर’चा डंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पुसेसावळी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच 15 उमेदवार निवडून देत ग्रामस्थांनी एकहाती सत्ता दिली आहे. तर लक्ष्मीनगर येथील सौ. सुरेखा अमोल माळवे यांची सरपंच पदासाठी वर्णी लागली.

सरपंचपद इतर मागास प्रवर्ग आरक्षित असल्याने सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दिगंबर रूद्रुके यांना पहिल्यांदा सरपंच होण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करत खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी सहकारमंत्री, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र दादा गुदगे आणि मा. उपसभापती चंद्रकांत पाटील आणि माजी सरपंच सुर्यकांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षात सुमारे 5 कोटी 43 लाखांची विकासकामे मार्गी लावली.

माजी सरपंच दत्तात्रय रूद्रुके यांनी राजीनामा दिल्यानंतर इतर मागास प्रवर्ग आरक्षित असल्याने याच प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून 1) सुरेखा अमोल माळवे, 2) सुनंदा नामदेव माळी, 3) गौरी समीर कुंभार आणि 4) जमाल नुरमहंम्मद नदाफ असे चार उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी सौ. सुरेखा अमोल माळवे यांची सरपंच पदासाठी वर्णी लागली. सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुरेखा माळवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या विकासकामा प्रमाणेच यापुढेही विकासकामांचा झंझावात आपल्या सर्वांच्या साथीने सुरूच राहतील अशी ग्वाही दिली.

यावेळी पुसेसावळीचे मंडलाधिकारी कुलकर्णी, गावकामगार तलाठी संदिप काटकर, ग्रामविकास अधिकारी विनोद खाडे, माजी सरपंच दत्तात्रय दिगंबर रूद्रुके, उपसरपंच डॉ. विजय कदम, माजी उपसरपंच अशोक काकासो कदम, विद्यमान सदस्य महादेव श्रीपती थोरवे, संग्राम चंद्रकांत कदम, सदस्या सौ. सुप्रिया किरण कदम, सौ.सुनंदा नामदेव माळी,सौ. गौरी समिर कुंभार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खोत, संभाजी शंकरराव कदम (सर), आबासाहेब जगताप आणि लक्ष्मीनगर (वंजारवाडी) येथील ग्रामस्थ आणि युवकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.