हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tatkal Ticket Booking। भारतात रेल्वेचा प्रवास हा लांब पल्ल्यासाठी सर्वात आरामदायी आणि स्वस्त मानला जातो. त्यामुळे रेल्वेमध्ये सतत गर्दी बघायला मिळते. सणावाराच्या काळात तर रेल्वे प्रवाशानी खचाखच भरलेली असते. अशावेळी तात्काळ तिकिटांची मागणी सुद्धा वाढते. प्रवासाच्या तारखेच्या एक किंवा दोन दिवस आधी हे तिकीट बुक केले जाऊ शकते. तातडीच्या प्रवासासाठी प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी तात्काळ तिकीटाची सोय करण्यात आली आहे, मात्र मागील काही वर्षात यात बराच काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. यावरून उपाय म्हणून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तत्काळ तिकीटांची ऑनलाईन बुकींग आता त्याच व्यक्तींना करता येणार आहे ज्यांच्या आधारकार्डचे ई- ऑथेंटीकेशन पूर्ण झालेले आहे अशी घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल कि, भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकिट बुकिंगसाठी (Tatkal Ticket Booking) ई-आधार पडताळणीची सुविधा सुरू करणार आहे. जेणेकरून खरे प्रवासी तत्काळ तिकिटाची सुविधा वापरू शकतील. म्हणजेच काय तर ज्यांचे आधारकार्डची ऑनलाईन पडताळणी झाली आहेत. त्यांनाच आता तत्काळ तिकीटांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. तत्काळ रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उचललेलं हे मोठं पाऊल म्हणता येईल.
Bharatiya Railways will soon start using e-Aadhaar authentication to book Tatkal tickets.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 4, 2025
This will help genuine users get confirmed tickets during need.
तात्काळ तिकिटांची मागणी जास्त – Tatkal Ticket Booking
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दररोज सरासरी २.२५ लाख प्रवासी आयआरसीटीसीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तत्काळ तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बुकिंग सुरू होताच तिकिटे इतक्या लवकर भरली जातात की बहुतेक प्रवासी पहिल्याच मिनिटात निराश होतात. २४ मे ते २ जून पर्यंतच्या आकडेवारीवरून असं दिसतंय कि, AC क्लास बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्या मिनिटात फक्त ५,६१५ तिकिटे बुक झाली, तर संभाव्य तिकिटांची संख्या १.०८ लाख होती दहा मिनिटांत ६७,००० हून अधिक तिकिटे बुक झाली, जी एकूण तत्काळ तिकिटांच्या ६२.५ टक्के आहे. नॉन-एसी क्लासमध्येही पहिल्या १० मिनिटांत सुमारे ६६ टक्के तिकिटे विकली गेली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतेय कि, तात्काळ तिकिटांची (Tatkal Ticket Booking) मागणी जास्त आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांना तिकीट न मिळता दुसरेच लोक त्याचा फायदा घेतायत… यासाठी अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ तिकिटासाठी इथून पुढे ई-आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे तात्काळ तिकिटाचा काळाबाजार रोखण्यास मोठी मदत होईल.