जेथे ठाकरे तिथे शिवसेना, शरद पवार तिथे राष्ट्रवादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजप सहित अजित पवार आणि निवडणूक आयोगावर सुद्धा चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक महाराष्ट्रीय जनतेला मूर्ख समजले काय? जेथे ‘ठाकरे’ तेथेच शिवसेना व जेथे ‘शरद पवार’ तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, हाच महाराष्ट्रीय जनतेचा मानस आहे असं सामनातून म्हंटल आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून तो मोदी-शहांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? म्हणूनच शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य पिंवा खंत वाटण्याचे कारण नाही. याच पद्धतीने हिंदुहृदयसम्राट शिवाप्रेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ‘आयतोबा’ एकनाथ मिंधे यांच्या हाती सोपवली गेली. म्हणजे तुम्ही बेइमानी करून, भ्रष्टाचार करून भाजपच्या गोटात या, आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात देतो, हीच ‘मोदी गॅरंटी’ आहे.

विधिमंडळातील बळ म्हणजे खरा राजकीय पक्ष नाही, विधिमंडळातील पक्ष वेगळा व पक्ष संघटन वेगळे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण ‘शिवसेना’ प्रकरणात असतानाही निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता लोकशाही व संविधानाची संपूर्ण हत्या करण्यासाठी हे सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले जाईल. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक महाराष्ट्रीय जनतेला मूर्ख समजले काय? जेथे ‘ठाकरे’ तेथेच शिवसेना व जेथे ‘शरद पवार’ तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, हाच महाराष्ट्रीय जनतेचा मानस आहे.

शरद पवार यांनीच अजित पवारांना सर्वार्थनि मोठे केले, पण गांडुळाने समुद्रावर दावा करावा असे आता घडले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष जनमानसात रुजलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कागदी निर्णयाने त्यांच्या अस्तित्वावर फरक पडणार नाही. निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे श्री. शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल. एकनाथ मिंधे, अजित पवार यांनी महाराष्ट्राचे गारदी म्हणून काम केले व गारद्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. शिवसेना असे अनेक घाव झेलून उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौन्यांनी झंझावात निर्माण केला आहे. शरद पवारही अनेक वादळे व संकटे झेलून उभेच आहेत. निवडणूक आयोग महाराष्ट्राचा हा उत्साह कसा संपवणार? मोदी-शहांची अप्रामाणिक गॅरंटी आणि निवडणूक आयोगाची घटनाबाहय झुंडशाही यांचा पराभव महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत सामनातून भाजपला इशारा देण्यात आला आहे.