मागणी नक्कीच पूर्ण होईल पण उपोषण मागे घ्या! शिष्टमंडळासह भिडेंची मनोज जरांगेंना विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे आज राज्य सरकारचा शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी गावात गेले आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासोबत संभाजी भिडे देखील मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी गेले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे उपोषण मागे घेतील असे म्हटले जात आहे. आज शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन कालच्या बैठकीतील मुद्दे त्यांच्यासमोर मांडले आहेत.

सध्या मनोज जरांगे आणि शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, संभाजी भिडे यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे आपले उपोषण मागे घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यामुळे आज संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर तसेच संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घ्या अशी विनंती केली आहे. परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे.

पण त्यांनी उपोषण मागे घ्यावं..

तर दुसऱ्या बाजूला संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. मात्र ‘मनोज जरांगेच्या लढ्याला नक्कीच यश येणार. शिंदे-फडणवीस आणि पवार हे धुरंधर नेते आहेत. त्यांची मागणी नक्कीच पूर्ण होईल. पण त्यांनी उपोषण मागे घ्यावं’ अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केली आहे. यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, “तुमच्या मागण्याही १०० टक्के योग्यच आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण तुम्ही उपोषण थांबवा आणि लढा सुरूच ठेवा, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्यात आम्हीही तुमच्या सोबत आहोत”