शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता १७ कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांना पैसे देण्याची (आरआरसी) कारवाई सुरु केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील २ कारखाण्यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात गेल्या गळीत हंगामात ( सन २०२२-२३) सहकारी आणि खाजगी अशा २११ साखर कारखान्यांनी १०५३.९१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०५.४० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले. या उसापोटी शेतकऱ्यांना ३५ हजार ५३२ कोटींची एफआरपी महिनाभरात मिळणे अपेक्षित असताना वर्षभरानंतरही २६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत.

कारवाई करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. साखर आयुक्तांनी १७ कारखान्यांवर आरआरसीच्या कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असले तरी राजकीय दबावामुळे बहुतांश जिल्हाधिकारी या कारखान्यांवर कारवाईच करीत नसल्याचे सागितले जात आहे.

आतापर्यंत ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यश

राज्यात ९९.५० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली असून काही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले होते. मात्र आयुक्तालयाने पाठपुरावा केल्यानंतर ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यश आले आहे.

एफआरपी न देणारे कारखाने

त्यामध्ये राजगड सहकारी(भोर), अजिंक्यतारा( सातारा), ग्रीन पॉवर शुगर (सातारा), पांडुरंग सहकारी( माळशिरस), मकाई(करमाळा), वसंतराव काळे(पंढरपूर), विट्ठलसाई सहकारी (उमरगा),अगस्ती(अकोले), बापूसाहेब थोरात(संगमनेर), सातपुडा- तापी सहकारी(शहादा),श्रद्धा एनर्जी( जालना), समृद्धी शुगर( जालना), भाऊराव चव्हाण( हिंगोली), टोकाई( हिंगोली), भाऊराव चव्हाण(नांदेड) या कारखान्यांचा समावेश आहे.