पंतप्रधानांनी गैरमार्गाने वेदांता प्रकल्प गुजरातला पळविला : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांता फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. आज जे डबल इंजिन महाराष्ट्रात चालले आहे, त्यांची किंमत राज्याला मोजावी लागत आहे. अचानक काही चक्रे फिरली, कुठे चित्रातही नसलेला गुजरात राज्यात हा प्रकल्प जाणार असे भारत सरकारने घोषित केले. यामध्ये पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातमध्ये नेलेला आहे, असा स्पष्टपणे आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप व नरेंद्र मोंदीवर केलेला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप व नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारवही हल्लाबोल केला. आ. चव्हाण पुढे म्हणाले, गुजरातचे या प्रकल्पासाठी कुठेही नाव नसताना हा प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपामुळे गेला. डबल इंजिन असलेले सरकार राज्यात आल्याने त्यांच्यातील कोणी काही बोलत नाही. त्यामुळे या सरकारची किंमत महाराष्ट्र राज्याला मोजावी लागली.

अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनमुळे मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याने, उद्योगपतीने अहमदाबाद बुलेट ट्रेन करावी अशी मागणी केली होती. बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे. या बुलेट ट्रेनचा 40 ते 45 टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलला आहे. अहमदाबादच्या लोकांना मुंबईला यायचे ठिक आहे, त्यांना विमानसेवा आहे. मग एवढी महागडी बुलेट ट्रेन पालघर, ठाणे या भागातून जाणार आहे. या ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे, हे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी द्यावी. मोदींच्या हट्टापायी हा प्रकल्प झालेला आहे. केवळ गुजरातचे महत्व वाढवायचे अन् मुंबईचे महत्व कमी करायचा हा एक प्रयत्न आहे. मुंबईतील बीकेसी येथील अत्यंत मोक्याची व हजारो कोटीची जागा या बुलेट ट्रेनसाठी दिलेली आहे. तेथे आता नविन कंपन्या, बिझनेस येणार नाही, या सर्वाचा परिणाम केवळ मुंबईचे महत्व कमी करायचे हा आहे. तेव्हा महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी मतदारांना सांगावे, वित्तीय सेवा अहमदाबादला गेल्याने मुंबईला किती फायदा झाला.