शिंदेंचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे २२ आमदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून तसेच खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. शिंदेकडे असलेल्या १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांनी आमची गळचेपी होत आहे असा निरोप ठाकरेंना पाठवला असा दावाही त्यांनी केला आहे. राऊतांच्या या दाव्याने राज्यातील सरकार पडणार तरी नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.

विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी स्वत:चं बुड स्थावर केलं आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे. यामधील २२ आमदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून शिंदेंसोबत असलेले खासदारही वैतागले आहेत. त्यांची कामं होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत असल्यानं त्यांच्या मनात खदखद आहे. त्यामुळे त्यांच्याकडील १३ खासदारांपैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत.

शंभूराजे देसाई यांनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला होता. आमची इकडे गळचेपी होत आहे, असं देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलंय असा खळबळजनक दावाही विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी झाली आहे. तानाजी सावंत यांना बजेट मिळत नाही. आगीतून फुफाट्यात पडल्याचं ते म्हणत आहेत. असा म्हणत विनायक राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.