निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या टिकेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.”मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात,” असे राऊत यांनी म्हंटले आहे.

खा. विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या सभेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी तुमच्या हाती महापालिकेची सत्ता आणून देतो, असे म्हंटले आहे. त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. निवडणूक आली की अस्तित्त्व दाखवण्यासाठी असे मेळावे घ्यायचे. निवडणुकीच्या वेळी कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांनी चालू केलेला आहे.

राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता. उद्धव ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे., असेही राऊत यांनी म्हंटले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगावमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. “कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले,” अशी टीका ठाकरे यांनी केली होती.