वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार न केल्यास आंदोलनाचा इशारा : दादा शिंगण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा येथे सहा पदरीकरण अंतर्गत उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी काही पर्यायी रस्ते पोलीस प्रशासनाला सुचवले आहेत. त्यामधील पंकज हॉटेलच्या पाठीमागून नवीन कोयना पुलाखालून मलकापूर नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत व तेथून आगाशिवनगर या रस्त्याचा समावेश आहे. आज या रस्त्याची कराड वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील व सपोनि. विजय जाधव यांनी पाहणी केली. यावेळी दादा शिंगण व त्या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

पर्यायी रस्त्यांच्या वापराबाबत दादा शिंगण यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रत खा. श्रीनिवास पाटील आ. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार कराड व मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात आले आहे.

दादा शिंगण यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सध्याची जी वाहतूक व्यवस्था ही रस्ते ठेकेदारांनी केली आहे. ती वाहतूक अतिशय दयनीय आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, पेशंट व सामान्य नागरिक वेळेत पोहोचू शकत नाहीत. तसेच दहावी व बारावीची परीक्षा चालू होणार असून मुलांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहोचणे बंधनकारक आहे. मुले वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले नाहीत, तर परीक्षेपासून वंचित राहतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. सदर रस्ते मार्गामुळे एखादी जीवित हानी होऊ शकते. तरी सुचवलेल्या या पर्यायी मार्ग व त्याबद्दल केलेल्या मागणीची दखल घेऊन संबंधित मार्गांची पाहणी करावी.

पर्यायी मार्ग मध्ये-
१) ढेबेवाडी फाटा आगाशिवनगर ते दत्त मंदिर नकाशातील 36 फुटी रोड.
२) जय मल्हार कॉलनी ते लाहोटी नगर मार्गे महामार्गापर्यंत.
3) सांडपाणी योजना ते यादव आर्केड मार्गे महामार्ग पर्यंत पांदीच्या रस्त्यावरून सद्यस्थितीत ऊस वाहतूक, शेतीमालाचे वाहतूक होत आहे.
४)पंकज हॉटेलच्या पाठीमागून ते नवीन पुलाखालून डायरेक्ट शहरात एंट्री होते. तसेच शहरातील तीन रस्ते मिळू शकतात. उदा.- शाहू चौक, अजंठा ट्रान्सपोर्ट, पोपटभाई पंप सिग्नल.
आता या पर्यायी मार्गामुळे दवाखाने शाळा व कामांच्या ठिकाणी जाणारे प्रत्येक व्यक्ती वेळेत पोहोचतील.
५)आत्ता जी जुन्या पुलावरून वाहतूक होते ते अतिशय धोकादायक आहे. कारण हा पूल पीडब्ल्यूडी ने दुरुस्त करून हलकी वाहने जाण्यास परवानगी दिली आहे. परंतु वाहतूक कोंडीमुळे ही वाहतूक जर पुलावरती कोंडली गेली तर मोठी भयंकर घटना घडू शकते. अशी एखादी गंभीर घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण?
६)हायवे कॉन्ट्रॅक्टरने फक्त त्यांच्या कामाचा विचार केला आहे पण नागरिकांच्या त्रासाचा अजिबात विचार केलेला नाही. उदा. विद्यार्थी, सिरीयस पेशंट, शेतकरी, कामगार व व्यापारी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मोठे कृष्णा हॉस्पिटलच्या पेशंटचा विचार केला नाही.
७) रस्त्याच्या बाजूच्या गटाराची बरीच झाकणी उघडे आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला गटारीमध्ये अनेक वेळा पडली आहेत. एखाद्या व्यक्तीची जीवित हानी होऊ शकते. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी.
सदर सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा तातडीने विचार करण्यात यावा अन्यथा दुर्लक्ष झाल्यास लाहोटीनगर, आगाशिनगर मधील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व कामगार सर्वांना एकत्र घेऊन आंदोलन करावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी असेही निवेदनात दादा शिंगण यांनी म्हटले आहे.