देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वांद्रे टर्मिनस ते बीकानेर दरम्यान धावणाऱ्या नव्या साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही ट्रेन केवळ प्रवासाचा वेगच वाढवणार नाही, तर महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील प्रवाशांना अधिक सोयीसुविधा देणार आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधानांनी देशातील 103 ‘अमृत भारत’ रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं, ज्यामुळे 18 राज्यांमधील 86 जिल्ह्यांतील स्टेशनांना नवसंजीवनी मिळणार आहे. याच कार्यक्रमात तब्बल ₹26,000 कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन झाले.
ट्रेन कधीपासून सुरू होणार?
- 21903 वांद्रे टर्मिनस – बीकानेर एक्सप्रेस: दर सोमवारी रात्री 11.25 वाजता वांद्रे टर्मिनसहून सुटेल, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8.40 वाजता बीकानेरला पोहोचेल. पहिली फेरी 26 मे 2025 पासून.
- 21904 बीकानेर – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस: दर बुधवारी सकाळी 8.50 वाजता बीकानेरहून निघेल, दुसऱ्या दिवशी सकाळी 6.45 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. पहिली फेरी 28 मे 2025 पासून. कोणत्या 20 स्थानकांवर थांबेल?
ही सुपरफास्ट एक्सप्रेस बोरीवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, साबरमती, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड, पाली मारवाड, जोधपूर, मेर्टा रोड, नागौर, नोखा, देशनोक, आणि बीकानेर अशा 20 स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबेल
प्रवाशांसाठी सुविधा
या ट्रेनमध्ये AC 3-टायर इकॉनॉमी आणि AC चेअर कार कोचेस असणार आहेत. बुकिंग 23 मे 2025 पासून सर्व पीआरएस काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. वेळापत्रक आणि कोच रचनेबाबत अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
रेल्वे विकासात मोठी झेप
पंतप्रधान मोदींनी या उद्घाटनावेळी सांगितले की, “70 मार्गांवर वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कोपऱ्यांत आधुनिक सेवा पोहोचत आहे. मागील 11 वर्षांत हजारो रस्ते ओव्हरब्रिज, अंडरपास आणि 34,000 किमी पेक्षा जास्त नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत.”ही नवीन ट्रेन महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील प्रवाशांसाठी एक नवा प्रवास अनुभव घेऊन येणार आहे – वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक!