हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यभर दहावीच्या परीक्षेला सुरुवात होताच जालन्यात (Jalna) मोठा गोंधळ उडाला आहे. बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या 15 मिनिटांत हा पेपर फुटला. विशेष म्हणजे, काही झेरॉक्स सेंटरवर अवघ्या 20 रुपयांत या प्रश्नपत्रिकेच्या प्रती विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्य सरकारच्या ‘कॉपीमुक्त’ अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बदनापूर परीक्षाकेंद्रातील हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानंतर त्याच्या झेरॉक्स काढून काही जणांनी विद्यार्थ्यांपर्यंत उत्तरे पोहोचवली. हा सर्व प्रकार परीक्षेच्या सुरुवातीला घडल्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. आता या घटनेनंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. तर अनेकजण सरकारवर टीका करत आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने यंदा दहावीच्या परीक्षेसाठी ‘कॉपीमुक्त’ अभियानाची घोषणा केली होती. तसेच, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. मात्र, पहिल्याच दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे हे अभियानच अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, “राज्य सरकारने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.