लग्नावरून परतत असताना काळाचा घाला : कार अपघातात 5 विद्यार्थी ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिन्नर येथील मोहदरी घाटात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातामध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली. लग्नावरुन परतत असणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या कारवर काळाने घाला घातला.

नाशिक येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी एका स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. संगमनेरहून ते परतत होते. त्यावेळी मोहदरी घाटात संध्याकाळच्या सुमारास त्यांची कार आली असताना यावेळी अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. स्विफ्ट कारमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने आणि वेग वाढल्याने हा अपघात झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे.

या अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपासही केला जाणार आहे. लेन ओलांडून विरुद्ध दिशेला कार घुसल्यामुळे या अपघाताची तीव्रता आणखी वाढली. यावेळी समोरुन येणाऱ्या वाहनांना या कारने जोरदार धडक दिली. समोरुन येणारी आणखी एख स्विफ्ट कार आणि इनोव्हा कार यांना धडक बसल्यानं तिन्ही गाड्याचं मोठं नुकसान झाले.

या अपघातातील तीन मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख अजूनही पटलेली नाही. सायली पाटील, प्रतीक्षा दगू घुले आणि शुभम तायडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अपघातात साक्षी नितीन घायाळ, साहिल गुणवंत वारके, गायत्री फरताळे, सुनील ज्ञानेश्वर दळवी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिन्नर आणि नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातातामुळे पाच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.