हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India। अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने मोठं पाऊल उचललं आहे. एअर इंडियाने त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा १५% ने कमी करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना चांगली कार्यक्षमता देण्यासाठी आणि आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी एअर इंडियाने हे पाऊल उचललं आहे. येत्या २० जून पासून हि उड्डाणात हि कपात होणार असून किमान जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहील. या काळात, कोणत्याही अनपेक्षित व्यत्ययाला तोंड देण्यासाठी एअर इंडियाकडे राखीव विमाने उपलब्ध असतील.
का घेतला निर्णय ? Air India
परदेशी उड्डाणे तात्पुरती बंद केल्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने (Air India) माफी मागितली आहे. याव्यतिरिक्त, अतिरिक्त खबरदारी म्हणून एअरलाइन बोईंग ७७७ विमानांसाठी सुरक्षा तपासणी वाढवेल. बुधवारी संध्याकाळी उशिरा जारी केलेल्या निवेदनात एअर इंडियाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, युरोप आणि पूर्व आशियातील अनेक देशांच्या हवाई क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूमुळे व्यत्यय आला आहे. सुरक्षा तपासणी वाढवली जात आहे. एअर इंडियाच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी आणि वैमानिकांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या कपातीमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांची माफी मागत, एअरलाइनने म्हटले आहे की ते त्यांना याबाबत आधीच माहिती देतील आणि त्यांना पर्यायी विमानांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जाईल
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने १२ जून ते १७ जून या कालावधीत एकूण ८३ उड्डाणे रद्द केली आहेत. दररोज देशात कुठे ना कुठे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे एअर इंडियाच्या (Air India) विश्वासार्हतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एअर इंडियाने १२ जून रोजी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना पुन्हा एकदा तीव्र शोक व्यक्त केला आहे. कंपनीने म्हटले आहे की अपघाताची चौकशी सुरू आहे. एअर इंडियाने डीजीसीए, एएआयबी आणि इतर संबंधित तपास संस्था आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरक्षा मानके मजबूत करण्याचे वचन दिले आहे.




