जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडले ! पैठण शहराला पुराचा धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 98.40 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. जायकवाडी धरणाचा जलसाठा 98.40 टक्के पेक्षा जास्त झालेला असताना पाणलोट क्षेत्रातून 1 लाख 976 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे बुधवारी सकाळी 11 वाजून सात मिनिटांनी अर्ध्या फुटाने वर उचलन्यात आले होते. त्यानंतर रात्री आत वाजता 75 हजार 456 क्‍युसेक गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता.

गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याने प्रशासनाच्यावतीने गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात एक लाख 976 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून धरण 98.40 टक्के भरल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून प्रशासनाने काल धरणातून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते धरणात दाखल झालेल्या नवीन पाण्याचे विधीवत जलपूजन करून दरवाजे उघडण्यात आले. यावेळी धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे दरवाजे सहा इंचांवर उचलून प्रत्येकी 524 क्युसेक असा एकूण 9 हजार 432 क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात आले तर 9 ते 27 क्रमांकाचे गेट हे 4 फूट उचलून एकूण 89 हजार 604 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे

यामुळे मात्र पैठण शहराला पुराचा धोका निर्माण झाला असून शहरातील गागाभट्ट चौक येथील पालकी ओट्या पर्यंत पुराचे पाणी आले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment