हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ashadhi Special Trains । उद्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा आणि आरामात व्हावा यासाठी सरकारने सुद्धा मोठे प्रयत्न केलेत. अनेक जिल्ह्यातून आषाढी एकादशीनिमित्त विशेष बस आणि रेल्वेगाड्या सोडण्यात आल्यात. आता आषाढी एकादशी उद्या आली असताना आज आणखी एक स्पेशल ट्रेन पंढरपूरला सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) नगरसोल ते मिरज दरम्यान धावणारी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन जाहीर केली आहे. हि ट्रेन १६ स्थानकांवर थांबणार आहे.
कसा असेल रूट? Ashadhi Special Trains
नगरसोल ते मिरज दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक ०७५१५) आज, ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता नगरसोल रेल्वे स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी, रविवार, ६ जुलै रोजी दुपारी ३:५५ वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर मार्गे ती धावेल. छत्रपती संभाजीनगरला ती रात्री ८:३० वाजता पोचेल. रेल्वेच्या रिटर्न प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास, ही ट्रेन (Ashadhi Special Trains) रविवार, ६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:२५ वाजता मिरज येथून निघेल आणि सोमवार, ७ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता नगरसोल येथे पोहोचेल. या रेल्वेमुळे भाविकांना वेळेत पंढरपूरला जाता येईल आणि विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
महाराष्ट्रातील विविध भागातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी, ही ट्रेन (Ashadhi Special Trains) तिच्या मार्गावरील १६ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. यामध्ये रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर या स्थानकांचा समावेश आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तांने राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हि विशेष ट्रेन सोडण्याची घोषणा केली आहे.




