अमरावती प्रतिनिधी । आज सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे.गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरुंना समर्पित केला जातो. या जगात धरणीवरचा देव म्हणून शेतकऱ्याला मानले जाते. कारण तो अन्नधान्य पिकवतो आणि हा शेतकरीच माझा गुरु आहे असे सांगत शेतकऱ्यांसाठी ७/१२ कोरा कोरा यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज चौथ्या दिवशी शेतकरी माता भगिनींचा शाल, हार, श्रीफळ देऊन सत्कार केला. इतकेच नाही तर माता भगिनींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असून त्याकडे कोणी लक्ष देत नसताना शेतकऱ्यांच्या ७/१२ सह कर्जमाफी प्रश्नी आवाज उठवणाऱ्या व त्याला गुरुचे स्थान देऊन त्याचा सत्कार करणाऱ्या बच्चू भाऊंना पाहताना अनेकांचे डोळे पाणावले.
‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘७/१२ कोरा करा’ यात्रेच्या आजच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांनी दारव्हा तालुक्यातील वळसा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त तेथील शेतकरी, महिला शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, हार घालून आशीर्वाद घेतला. वळसा येथून शेतकऱ्यांचा सत्कार केल्यानंतर आपल्या सातबारा कोरा यात्रेचा निर्धारपुर्वक पुढचा टप्पा बच्चू भाऊंनी सुरु केला.
शेतकऱ्यांच्या सातबारा कोरांसह विविध मागणीसाठी उन्ह, वारा, पाऊस आणि दिवस रात्र याचा विचार न करता पायी चालत निघालेल्या बच्चू भाऊंच्या सातबारा कोरा कोरा यात्रेला गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पायी चालत असल्याने बच्चू भाऊंच्या पायांना जखमा झाल्या आहेत तरी देखील त्या जखमा सोसत बच्चू भाऊंनी आपली हि यात्रा सुरूच ठेवली आहे. सर्व जाती धर्मातील, पक्षातीळ शेतकरी बांधव बच्चू भाऊंच्या या यात्रेत पक्ष, जातपात सहभागी होताना दिसून येत आहेत.




