हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) महाविकास आघाडीत समन्वय साधून येत नसल्यामुळे प्रमुख घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तिन्ही पक्षांची एकत्र बैठक घेण्याचा सल्ला दिला होती. अखेर या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) (उबाठा) पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली.
बैठकीतील निर्णय
या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाकडे देण्याचा निर्णय झाला. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे सोपवण्यावर चर्चा झाली. यावर आता अंतिम निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच घेणार आहेत. या बैठकीत ठाकरे गटातून अनिल परब आणि सुनील प्रभू यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी, तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि नसीम खान यांनी उपस्थिती दर्शवली होती.
दरम्यान, मागील सरकारच्या काळात विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यामुळे आघाडीची सत्ता येऊ शकली नाही. यावेळी मात्र विधानसभेत ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय झाला. आता या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.