वनविभागाचा पराक्रम! नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी चक्क कर्मचाऱ्यालाचं बसवलं पिंजऱ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर । एखाद्या नरभक्षक वाघला किंवा बिबट्याला एक तर बेशुद्ध करून पकडले जाते वा पिंजऱ्यात बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. मात्र, राजुरा तालुक्यात १० जणांचे बळी घेणारा आर टी -१ वाघ या प्रयोगाला जुमानत नसल्याने वनविभागाने एक जीवघेणी शक्कल लढवली आहे. वनविभागाने बकरीऐवजी विभागातील कर्मचाऱ्यांनाच चक्क पिंजऱ्यात बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राजुरा वनक्षेत्रासह परिसरातील वनक्षेत्रात आरटी-१ वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने दहा जणांचा बळी घेतला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करा वा ठार मारा असाशेतकऱ्यांसह राजकीय दबाव वनविभागावर वाढला आहे. वाघ पिंजऱ्यात अडकत नाही. शिवाय तो शॉर्प शूटरच्या निशाण्यावरही येत नसल्याने वनविभाग हतबल झाला आहे. अखेर वनविभागाला बकरीऐवजी वनपाल, वनरक्षक व वनमजुराला पिंजऱ्यात बसवावे लागत आहे.

चक्रावून सोडणारी बाब म्हणजे पिंजऱ्यात कोण किती वेळ बसणार याचे वेळापत्रक वनविभागाने तयार केले आहे. कर्मचाऱ्यांना सायंकाळी ६ ते सकाळी ८ असे तब्बल १४ तास पिंजऱ्यात बसविले जात आहे. राजुरा वनक्षेत्रात ११ ऑक्टोबरपासून हा प्रयोग राबविला जात आहे. तो १८ ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार आहे. दरम्यान, सदर नरभक्षक वाघ पिंजऱ्यात बसलेल्या वनपाल, वनरक्षक वा वनमजुराजवळ फिरकला सुद्धा नसल्याचे समजते.

बिबट विहिरीत पडला वा वाघ जखमी अवस्थेत आहे. अशावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी मनुष्याला पिंजऱ्यात बसवून जवळ नेले जाते. त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करणे सहज शक्य होते. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागात एका जखमी वाघाची जवळून माहिती घेण्यासाठी हा प्रयोग केला होता, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment