प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा (BJP Operation Lotus)भाग असू शकते, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.

“गेल्या काळात मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस दिली. लोकांना आता माहिती झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय”, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

“अर्णव गोस्वामी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तसंच कंगनाच्या प्रकरणात सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो आक्रमकपणे बोलतो त्याला विविध मार्गाने त्रास दिला जातो. सरनाईकांवरील कारवाईचा मला अंदाज होता. जसं वाटलं तसंच घडलं”, असं भुजबळ म्हणाले. “भुजबळ भाजविरोधात जास्त बोलले की छापेमारी आणि केसेस, पवारसाहेबांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली तर नोटीस, अशी दडपशाही भाजपने केली. भाजपला जरी ही दडपशाही वाटत नसली तरी लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे. भाजपच्या एकाही नेत्याला का बरं ईडीची नोटीस गेली नाही?”, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

“ईडी, सीबीआय हे भाजपचे बाहुले आहेत. भाजपने संस्थांना हाताशी धरुन सत्तांतराचा कितीही प्रयत्न करु देत महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि फक्त 5 वर्षाचा कार्यकाळ नाही तर पुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Chhagan Bhujbal Attacked on Bjp over ED Raids residence of Shivsena MLA pratap Sarnaik)

काँग्रेसचा हल्लाबोल
काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

 भाजपचा पलटवार
“प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याची माहिती ईडीचे प्रवक्ते देतील.. काँग्रेसच्या काळात सीबीआय पोपट होता. कायद्याला धाब्यावर बसवून काँग्रेसने काम केलं. भाजपच्या काळात यंत्रणेला स्वातंत्र्य आहे. नियमाप्रमाणे संस्था काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही धास्ती वाटणं साहजिक आहे”, असं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला दिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment