मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी लोकल ट्रेन सुरु करा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याच्या काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्याही ऐकल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली.

कोरोना व्हायरसशी देश, राज्य आणि मुंबईचा लढा सुरु असताना या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी आणि बेस्ट सेवा सुरु आहे. पण, या बसेसची संख्या तुलनेने कमी आहे, त्यामुळे ही समस्या कर्मचाऱ्यांपुढे आहे. परिणामी लोकल ट्रेन सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदींना केली आहे. मात्र, फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींसोबतच्या चर्चेत स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच २२ मार्चपासून आजतागायत मुंबईत एकही लोकल धावलेली नाही. रेल्वेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. पण, आता मात्र हे चित्र काही अंशी बदलण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच राज्यात आणि आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईपुढे असणाऱ्या अडचणी पाहता मुख्यमंत्र्यांनी लोकल पुन्हा सुरु करण्याची ही मागणी पंतप्रधानांकडे केल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही मागणी पाहता आता केंद्राकडून यावर कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment