कराड | सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भूक भागेना त्याच्याकडे आज राज्याचे सहकारमंत्री पद, सह्याद्री कारखान्यांचे चेअरमन, आमदार आहेत. राज्यातील शिखर बॅंकेसह जिल्हा बॅंका त्याच्या ताब्यात आहेत. तरीही सातारा जिल्हा बॅंकेत रस आहे. सहकारमंत्री म्हणतात सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हा बॅंक निवडणूकीत उभा असल्याचे वक्तव्य साफ खोटे असून त्यांची भूक भागेना, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला आहे.
कराड येथे प्रशासकीय इमारतीसमोर गेले नऊ दिवस बळीराजा शेतकरी संघटनेचे ऊसाला एकरकमी एफआरपी अधिक 600 रूपये मिळावेत, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तेथे पंजाबराव पाटील बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, विश्वास जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, बळीराजा शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज नववा दिवस आहे, मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री भेटायला आले नाहीत. बाळासाहेब पाटील म्हणतात, मी शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणुकीत उभा आहे, मग आम्ही कुणाच्या हितासाठी बसलो आहे. तेव्हा तुमचे शेतकऱ्यांच्यावर पोकळ प्रेम दाखवू नका, समोरासमोर यावे. आमच्याशी चर्चा करावी आणि आम्ही तुम्हांला एकरकमी अधिक 600 रूपये कसे द्यायचे ते पटवून देवू, ते मिळवून दिले तर तुम्ही सहकारमंत्री शोभता. नाहीतर तुम्ही मंत्री सुध्दा शोभण्याच्या पात्रतेचे नाही.