बारामतीत २९ जुलैला धनगर समाज विश्वासघात दिन-विक्रम ढोणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती : अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नावरून धनगर समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात भारतीय जनता पक्ष आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. फडणवीस यांनी २९ जुलै २०१४ रोजी बारामतीत धनगर समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही, उलट समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला. या कपटी राजकारणाचा निषेध करण्यासाठी २९ जुलै २०२१ रोजी धनगर समाज विश्वासघात दिन पाळणार असून त्याअंतर्गत बारामती येथील प्रशासकीय इमारतीसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या निषेधाबरोबरच आघाडी सरकारकडे ठोस मागण्या या आंदोलनातून करणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली.

ढोणे यांनी आंदोलनासंबंधीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षांपासून अनुसुचित जमातीच्या (एसटी) आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे, मात्र समाजाला आजवर न्याय मिळालेला नाही. सातत्याने समाजाच्या पदरी निराशाच आलेली आहे. राजकीय मंडळींनी षढयंत्रपुर्वक फसवल्यानेच समाजाची ही दुर्दशा झालेली आहे. याप्रश्नी एका बाजूला समाज प्रबोधन करत असताना दुसऱ्या बाजूला शासनाला कृतीशील भुमिका घेण्यास आम्ही भाग पाडत आहोत. २९ जुलै २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन बारामतीत दिले, मात्र ते पाळले नाही. प्रत्यक्षात धनगर समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करून घेतला. केंद्र सरकारला आरक्षण संबंधाची शिफारस पाठवली नाही. टिसच्या सर्वेच्या माध्यमातून मात्र समाजाला वेड्यात काढले.

पाच वर्षे समाजाचा बुद्धीभेद करून अक्षरशः धुळफेक केली. अशा षढयंत्रांना धनगर समाजाबरोबर इतर वंचित समाजाने बळी पडू नये, म्हणून धनगर समाज विश्वासघात दिन पाळून आम्ही लक्षवेधी आंदोलन करत आहोत. राज्यातील सत्तारूढ आघाडी सरकारनेही याप्रश्नी ठोस काही केलेले नाही. या सरकारने तातडीने मंत्री समिती स्थापन करून याप्रश्नी कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनातून आम्ही करणार आहोत. कोरोना संसर्गकाळाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाला संपुर्ण सहकार्य करून प्रातिनिधीक आंदोलन करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

Leave a Comment