निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण : ‘संकल्प 221 वृक्ष लागवड’ उपक्रमाचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते समारोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. संत तुकाराम यांच्या अभंगात म्हटले आहे, त्याप्रमाणे निसर्ग ग्रुपच्या वृक्षरोपणातून वृक्षवल्ली आम्हां सोयरे प्रमाणे या झाडात देव शोधण्याचे काम केले आहे. निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

कराड तालुक्यातील पुनर्वसीत डिचोली – धोंडेवाडी येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित ‘संकल्प 221 वृक्ष लागवडीचा’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील, सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सतीश मोरे म्हणाले, 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे. डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. ‘याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा’, याची प्रतिची आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले. आभार सुरेश चौघुले यांनी मानले.

वडाची डिचोली म्हणून गाव ओळखले जाईल

डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु परिवाराच्या वतीने करण्यात आले. वडाची डिचोली म्हणून गाव ओळखले जाईल पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी ग्रुपने घेतला आहे. आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत. यातील 75 झाडे वडाची आहेत. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment