मुंबईसह महाराष्ट्रात धावणार ई-बाईक टॅक्सी , जाणून घ्या काय आहेत नियम ?

e bike taxi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशातील अनेक राज्यांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही याला हिरवा कंदील दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी लोकल, मेट्रो, बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षानंतर आता ई-बाईक टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवास

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार ई-बाईक टॅक्सी एग्रीगेटर धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे. पुढील एका-दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून, भाडे निश्चित करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते, जिथे सध्या ऑटो रिक्षाने प्रवास करण्यासाठी 100 रुपये खर्च येतो, तिथे ई-बाईक टॅक्सीत फक्त 30-40 रुपये खर्च होऊ शकतात.

ई-बाईक टॅक्सीचे नियम

  • फक्त इलेक्ट्रिक बाईकना परवानगी
  • बाईकचा रंग पिवळा असणे आवश्यक
  • जीपीएस बसवणे अनिवार्य
  • चालक व प्रवाशांसाठी विमा कव्हर देणे बंधनकारक
  • चालकांची पार्श्वभूमी तपासली जाईल
  • एकत्र 50 ई-बाईक असणाऱ्या कंपन्यांना परवानगी
  • महिला सुरक्षेसाठी विशेष नियम लागू पर्यावरणपूरक आणि रोजगारसंधी निर्माण करणारा निर्णय

ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करणाऱ्या एग्रीगेटर कंपन्यांना फक्त इलेक्ट्रिक बाईकच वापरण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण होईल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील. विशेषतः महिला चालकांना या क्षेत्रात संधी मिळेल. याशिवाय, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस, इमर्जन्सी संपर्क सुविधा, वेग नियंत्रण आणि स्वच्छता यांसारखे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.

प्रवाशांची गैरसोय होणार नाही

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आतापर्यंत एकट्या प्रवाशाला रिक्षा किंवा टॅक्सीचे तीनपट भाडे भरावे लागत होते. मात्र, ई-बाईक टॅक्सीमुळे ही अडचण दूर होणार आहे. या सेवेसाठी 15 किमी अंतराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ज्या एग्रीगेटरकडे 50 ई-बाईक असतील, त्यांनाच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

या निर्णयामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर होईल, तसेच वाहतुकीला एक नवीन आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे.