औरंगाबादेत ईडीचे छापे – एका बड्या व्यावसायिकाविरोधात कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात आज बड्या उद्योजकांविरोधार ईडीने एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर ही कारवाई सुरु आहे, हे गोपनीय होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे.

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर ही धाड पडली आहे. बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत. तसेच संबंधित व्यावसायिक हे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आहेत.

सात ठिकाणी धाडी, 54 अधिकाऱ्यांचा ताफा
वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ बोर्ड हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकल्यादेखील आहेत. हा गैर व्यवहार शेकडो कोटींचा झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपाससत्र सुरु होतं. त्यानुसार औरंगाबादमध्येही ही धाड पडली आहे. या धाडींसाठी ईडीच्या 54 अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले असून व्यावसायिक आणि उद्योजकांची घरे व आस्थापनांवर छापे टाकले जात आहेत.

Leave a Comment