हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Eknath Shinde On Maratha Aarakshan । मराठा समाजाला ओबीसी कोट्यातुनच आरक्षण मिळावं हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय इथून उठणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातून केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि लाखो मराठा बांधव मुंबईत एकवटल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, परंतु ओबीसी आरक्षण काढून मराठा समाजाला ते देता येणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसेल ते देऊ असं एकनाथ शिंदेनी म्हंटल आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले? Eknath Shinde On Maratha Aarakshan
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आजही त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली. लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत, आजही ती समिती काम करत आहे. आमच्या सरकारने सारथीच्या माध्यामातून विविध कोर्सेस सुरू केले, त्याचा लाभ होतोय. समाजाला बिनव्याजी कर्ज, हॉस्टेलची सोय केली. अनेक योजना मराठा समाजासाठी आणल्या, त्याचा लाभ मराठा समाजाला मिळतोय.
परंतु ओबीसी समाज असो वा इतर कोणताही समाज असो, त्यांचं आरक्षण कमी करून दुसऱ्याला देऊन, याच काढून त्याला देणे हे करता येणार नाही. पण मराठा समाजासाठी जे जे करता आलं ते आम्ही केलं, यापुढेही आम्ही करेन.. जे योग्य आहे, कायद्याच्या चौकटीत आणि नियमात बसून जे काही द्यायचं आहे ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे (Eknath Shinde On Maratha Aarakshan) अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिली. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे, हे सरकार गोळ्या घालणार सरकार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरेंची भूमिका काय?
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांनाही पत्रकारांनी विचारलं कि, मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? याबाबत तुमचं मत काय आहे? त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी आरक्षणाचा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टाकला. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार? माझ्याकडे आत्ता सत्ता नाही, काहीच नाही, त्यामुळे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.




