सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशीवर भाजप नेते खवळले; ट्विटवर सोडलं टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्लोबल सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीट केले होते. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मोदी सरकाराच्या समर्थानात शेतकरी आंदोलनावरून ट्वीट केलं होत. अशातच महाराष्ट्र सरकारने सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचा तीळपापड झाला असून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

”आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पॉप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्वीटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले आहे, असे नमूद करताना कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर. आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शरजीलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!”, असे खोचक ट्वीट शेलार यांनी केले आहे.

मोदी सरकारचे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७३ दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर देशातील सेलिब्रेटीजचा केंद्र सरकारने गैरवापर केला आहे, असा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले आहे. देशमुख यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून ते सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देशमुख यांच्याशी चर्चा केली.

समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी देशमुख यांच्याकडे केली. यावेळी देशमुख यांनी या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन सावंत यांना दिले. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी देशमुख आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment