पूरग्रस्तांना मदत : कराड शहरात इंद्रजित गुजर मित्र परिवाराकडून आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या हस्ते अन्नधान्य वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मुसळधार झालेल्या पावसाने लोकांचे मोठे नुकसान केले आहे. या संकटातून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी काम करणे गरजेचे आहे. नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी पाटण काॅलनीतील लोकांना मदत करून एक सामाजिक आदर्श पुढे ठेवला आहे. पुरामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे, अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे व एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

कराड शहरातील पाटण कॉलनी पुरग्रस्त 85 कुटुंबांना इंद्रजित गुजर मित्र परिवाराकडून 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्याचे किट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, नगरसेवक इंद्रजीत गुजर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, काँग्रेसच्या कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक फारूक पटवेकर, सिद्धार्थ थोरवडे आदी यावेळी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे आणि या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती, जनावरे आणि रस्ते वाहून गेले आहेत. अश्या प्रसंगी राज्य शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे. या आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ दिले जात आहे. तसेच पुरग्रस्तांच्या मालमत्तेचे पंचनामे काही प्रमाणात पूर्ण झाले असून त्यांना लवकरात लवकर मदत मिळेल तसेच पुरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आग्रही राहू.

Leave a Comment