कंगनाने घेतला धर्माचा आसरा! म्हणे ‘मुस्लिम वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांवर चित्रपट बनवला’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना  कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, आपल्यावरील टीकेला उत्तर देताना आता कंगनाने धर्माचा आधार घेतला आहे. मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट तयार करण्याची हिंमत दाखवली, असे म्हणतं कंगना राणौत हिने नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

कंगना राणौतने शिवसेनेवर आगपाखड करत म्हटलं, हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही. मात्र, मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा शिवाजी महाराज आणि झाशीच्या राणीवर चित्रपट तयार केला. त्यासाठी मी जीव आणि कारकीर्द पणाला लावली होती. मात्र, महाराष्ट्राच्या या ठेकेदारांनी आजवर काय केले, असा सवाल कंगना राणौतने शिवसेनेला विचारला आहे.

याशिवाय, कंगनाने पालघर हत्याकांडाचा मुद्दा उकरून काढत महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पालघरमध्ये साधुंना दगड आणि काठ्यांनी ठेचून मारले. मात्र, त्याचे कोणतेही परिणाम तुम्हाला भोगावे लागले नाहीत. या सगळ्यामुळेच तुमची हिंमत वाढली आहे. त्यामुळे तुम्ही मला जाहीरपणे मारण्याची धमकी देत आहात, असे कंगनाने म्हटले. तर दुसरीकडे कंगनाच्या या वक्तव्यांवर शिवसेनेच्या गोटातूनही सातत्याने प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या ९ तारखेला कंगना राणौत मुंबईत येणार आहे. त्यावेळी कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment