विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय; पालकांच्या खिशाला बसणार कात्री

0
2
education department
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिक्षण विभागाकडून (Education Department) राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, पुन्हा एकदा नियमित स्वरूपातील पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. नुकताच या संदर्भात शासन निर्णय उपसचिव तुषार महाजन (Tushar Mahajan) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

गतवर्षी शालेय दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पानांचा समावेश करण्यात आला होता. या निर्णयामुळे स्वतंत्र वह्यांची गरज भासणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थी पाठ्यपुस्तकांसोबत स्वतंत्र वह्याही नेऊ लागले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे पुन्हा वाढले.
तसेच, अनेक पालकांनी या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन सरावावर परिणाम होत असल्याचे नमूद केले.

या सर्व बाबींचा विचार करून नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र पाठ्यपुस्तके आणि वह्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसोबत स्वतंत्र वह्यांची खरेदी करावी लागणार आहे. यामुळे पालकांच्या आर्थिक बजेटवर परिणाम होईल.

दरम्यान, शिक्षक संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की, येत्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के नवीन पाठ्यपुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका विनामूल्य पुरवण्यात याव्यात. यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेसे लेखन साहित्य मिळावे यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

महत्वाचे म्हणजे, राज्य शासनाच्या या नव्या निर्णयामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही पालकांनी सरकारच्या धोरणातील सातत्याच्या अभावावर नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी हा निर्णय आवश्यक असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.