महिला दिन विशेष । दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिरवळ येथील समिना शेख यांचा प्रेरणादायी संघर्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड 

शिरवळ ता.खंडाळा येथील समिना शेख गेली ३ वर्ष दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी कृतिशील संघर्ष करीत आहेत.शिरवळच नव्हे संपूर्ण खंडाळा तालुक्यात समिना शेख या नावाची ओळख होत असताना संघर्ष करणारी व्यक्ती म्हणून परिचित झालेली आहे.राजकारण,सामाजिक काम यात अनेक महिला आपली ओळख बनवतात परंतु समिना शेख यांनी आपली ओळख स्व संघर्ष करून बनवली.

फक्त घर आणि स्वयंपाक यामध्येच अडकून पडलेल्या समिना शेख दिव्यांगाच्या समस्या सोडवण्यासाठी बाहेर पडल्या.त्या स्वतः दिव्यांग असून त्यांनी स्वतःच्या परिस्थितीवर मात करीत फक्त स्वतःचीच समस्या न सोडवता इतरांच्या ही समस्यांसाठी, हक्कांसाठी लढले पाहिजे ही भावना मनाशी बाळगून त्यांनी संघर्ष चालू केला.आज हा संघर्ष अनेक दिव्यांगाना जगण्याची नवं प्रेरणा देत असून हक्क मिळविण्यासाठी समिना शेख हा एक हक्काचा आवाज बनलेला आहे.२०१८च्या नोव्हेंबर मध्ये “प्रहार अपंग क्रांती संस्थेत” खंडाळा तालुका महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली..

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या प्रेरणेने काम करीत असताना त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निश्चय केला. त्या गेली तीन वर्षे “प्रहार अपंग क्रांती संस्थेत” गेली तीन वर्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते तालुक्यातील सर्वसामान्य दिव्यांगापर्यंत त्यांचे कार्य पोहचलेले असून त्यांच्या कार्याची दखल ही प्रशासनास घ्यावी लागली.लाखो रुपयांचे दिव्यांगांचे ५%अपंग कल्याण निधी विविध,घरकुल योजना,पेन्शन योजना लाभ त्यांनी अपंगाना मिळवून दिला.तालुक्यातील अनेक दिव्यांगांना एकत्रित आणत त्यांच्या पर्यंत विविध शासकीय योजना बाबत जागृती घडवून आणली.सुरूवातीचे सहा महिने एकमेकांची भेटी घेत, समूह तयार करताना एकमेकांना साथ देण्यात आली.विविध निवेदन देत आंदोलन छेडण्याचा मार्ग अवलंबवत असताना आज त्याच जोशाने संघर्ष करुण न्याय मिळवून अपंगांना सक्षम बनविणे त्यांना विविध सुविधा मिळवून देणे या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपण समाजाला काही देण लागतो. या बाबीवर लक्ष केंद्रीत करत दिव्यांगांनी फक्त मागू नये समाजासाठी काहीतरी देऊन जावे.या प्रेरणेने त्यांनी दिव्यांगा सोबत नदी स्वच्छता अभियान, अवयव दान,पुरग्रस्ताना कपडे अन्न वाटप,पुरा मुळे नॅशनल हायवेला अडकलेल्या ट्रक ड्रायव्हर यांना पाणी, चहा,नाश्ता वाटप,सिव्हिल हाँस्पिटल ला अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत करणे,अपंगाना शासकीय योजनांचे मार्गदर्शन करणे,मतिमंद मुलांना पुणे शिबीरात चेकअप ला घेऊन जाणे,दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर,दिव्यांगाना शिबीरात घेऊन जाणे, कोवीड महामारीतही पोलीस, कोवीड सेंटर, गरिब अनाथ वाटसरु लोकांना भेळ,पाणी, धान्य किट वाटप,या प्रकारची अनेक सामाजिक कार्य ते करत आहेत.

अवयव दान केल्यामुळे पुढच्या व्यक्ती ला येणारे अपंगत्व प्रमाण कमी करता येईल अवयव दान केल्याने “मरणा नंतर ही एखाद्यात जिवंत राहता येते”ही सुंदर संकल्पना त्यांनी दिव्यांगाच्या मनात रूजवली.शासकीय अधिकारी दिव्यांगाना योग्य लाभ देत नाही.या अन्याया विरुद्ध लढताना “एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ या मार्गाने दिव्यांगाना सक्षम करण्याची भूमिका राबवित आहेत.त्यांच्या या कार्यात त्यांचे सहकारी प्रवीण भुजबळ (खंडाळा तालुका संपर्क प्रमुख), सपना अग्रवाल(प्रहार कार्यकर्ते) व इतर सहकारी यांनी ही महत्त्वाची भूमिका निभावली.. प्रहार, आधार, सक्षम या तीन बचतगट चालू करुन दिव्यांगाना स्वतः चा उदरनिर्वाह चालु करण्यासाठी प्रेरित केले.आज दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी जे राखीव असलेले गाळे आहेत ते शासकीय यंत्रनेकडून मिळावेत म्हणून एक प्रहार अध्यक्ष जबाबदारी म्हणून समिना शेख स्वतः ग्रामपंचायत आवारात गाळे मिळवण्यासाठी झटत आहेत.दिव्यांगांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारी ही प्रेरणादायी अध्यक्षा दिव्यांगाना कमकुवत न बनवता सक्षम बनवत आहे,न्याय व स्वतः च्या हक्कासाठी ओळख लागत नाही तर फक्त हक्कासाठी ठामपणे, जिद्द चिकाटीने कार्य केले पाहिजे अशी भावना ठेवून अशा या प्रहारच्या वाघिणीचे काम इतर दिव्यांगाना लढण्याचे बळ देऊन जात असून समिना शेख यांचा संघर्ष प्रेरणादायी असाच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment