हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) महाविकास आघाडीला चांगले यश मिळाली. परंतु विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आघाडीला भाजपसमोर मात खावी लागली. आणि प्रयत्न करून देखील आघाडीला बहुमत मिळवत आले नाही. या अपयशाचे खापर आता महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर फोडताना दिसत आहेत. कारण, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या पराभवाबाबत परखड भाष्य केले आहे.
अलिबाग येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांनीच दगा दिला असल्याचे म्हणले आहे. जयंत पाटील म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत आम्ही इंडिया आघाडीत प्रामाणिकपणे काम केले होते. डाव्या पक्षांच्या मतांमुळे महाराष्ट्रात ३१ खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आम्हाला मदत केली नाही. मित्रपक्षांनी दगा दिल्यामुळे आमचा पराभव झाला आहे.”
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील डाव्या प्रागतिक पक्षांनी २० जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडीने त्यांना अपेक्षित जागा न दिल्याने नाराजी निर्माण झाली. परिणामी, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, ज्याचा थेट फटका अधिकृत उमेदवारांना बसला. शेकापला मिळालेल्या काही जागांवरही अशाच प्रकारच्या लढती झाल्या, त्यामुळे पक्षाला रायगडमधील बालेकिल्ल्यात अपयशाला सामोरे जावे लागले. सांगोला मतदारसंघ ही एकमेव जागा शेकाप जिंकू शकला.